यंदाच्या वर्षी देशात पावसाचे प्रमाण मागच्या वर्षीच्या तुलनेत 8 टक्के कमी झाल्याचे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
नवी दिल्ली – यंदाच्या वर्षी देशात पावसाचे प्रमाण मागच्या वर्षीच्या तुलनेत 8 टक्के कमी झाल्याचे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. देशात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून महाराष्ट्रातील 123 तालुके, राजस्थानातील 5 तालुके, गुजरातमधील 132 तालुके तर कर्नाटकातील सर्वाधिक 412 तालुके दृष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. देशातल्या 71 टक्के भागातचं केवळ समाधानकारक पाऊस झाला असून 29 टक्के भागात पावसाचं प्रमाण कमी आहे.
दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिककर्जांवरील व्याजदरात कपात करण्यात आली आहे. पिककर्जावरील व्याजदर हे 12 टक्क्यांवरुन 7 टक्के कमी करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे बियाणांवरच्या अनुदानाला मार्च 2013 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असं कृषीमंत्री शरद पवार यांनी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत सांगितले.
महाराष्ट्राला 160 कोटी
महाराष्ट्र राज्याला पिण्याच्या पाण्यासाठी 160.7 कोटी रुपये मदत केंद्र सरकारकडून देण्यात आल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सांगितले.