पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी दिलेल्या आश्वासनानंतरही केंद्रीय व्यापारी संघटना आणि सरकार यांच्यातील चर्चा फिस्कटली.
नवी दिल्ली – पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी दिलेल्या आश्वासनानंतरही केंद्रीय व्यापारी संघटना आणि सरकार यांच्यातील चर्चा फिस्कटली. त्यामुळे २० आणि २१ फेब्रुवारीला पुकारलेला संप होणारचं, अशी भूमिका व्यापारी संघटनांनी घेतली आहे.
पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी रविवारी ११ व्यापारी संघटनांना २० फेबुवारीला होणारा संप मागे घेण्याची विनंती केली होती. या संपामुळे सर्वसामान्य व्यक्ती भरडला जाईल तसेच अर्थव्यवस्थाही ठप्प होईल असे पंतप्रधानांनी सांगितले होते. एवढेच नाही तर पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्री ए.के.अँन्टोनी, शरद पवार, पी.चिदंम्बरम आणि मल्लिकार्जून यांना संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन चर्चेतून मार्ग काढण्यास सांगितले होते.
त्यानुसार संरक्षण मंत्री ए.के.अँन्टोनी, कृषी मंत्री शरद पवार हे सोमवारी रात्री आठ वाजता कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी भेट घेणार आहेत. मात्र संप मागे न घेण्यावर अद्याप आपण ठाम आहोत असे सीआयटीयूचे सचिव तपन सेन यांनी सांगितले. महागाई आणि कामगार कायदा या दोन मुद्दयावर सरकारकडून ठोस निर्णयाची अपेक्षा असल्याचे सेन यांनी स्पष्ट केले. या बैठकीला सर्व ११ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत.