शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सेनेच्या ६१ आमदारांना घेऊन एकविरा देवीच्या दर्शनाला गेले. त्याची मोठी बातमी प्रसिद्ध झाली. देवदर्शन हा काही जाहीर कार्यक्रम असू शकत नाही. तो प्रत्येकाच्या जीवनातील व्यक्तिगत श्रद्धेचा भाग आहे. या देवदर्शनाचे सार्वजनिकीकरण करण्यात आले आणि उद्धव ठाकरे यांच्यासह ६१ आमदार एकविरा देवीच्या पाया पडले.
निवडणुकीआधीही उद्धव ठाकरे कोल्हापूरच्या महालक्ष्मी दर्शनाला गेले होते.तुळजापूरच्या भवानीमातेचे दर्शनही त्यांनी घेतले होते आणि एकविरा देवीलाही त्यांनी साकडे घातले होते. एकविरा देवी संस्थानचे अध्यक्ष अनंत तरे हे शिवसेनेविरोधात बंडखोरीच्या पवित्र्यात असतानाच तिकडे उद्धव ठाकरे एकविरा मातेचा आशीर्वाद घ्यायला गेले. निवडणुकीआधी घेतलेल्या दर्शनाचा उद्देश हा व्यक्तिगत श्रद्धेचा नव्हता तर एकविरा मातेने सेनेला बहुमत द्यावे, यासाठी होता. महालक्ष्मी किंवा तुळजाभवानी यांच्या दर्शनासाठी गेलेल्या उद्धवना त्या दोन्ही श्रद्धास्थानांचा आशीर्वाद मिळाला नाही. कोण आडवे आले माहीत नाही; पण, उद्धवजींच्या इतिहासाप्रमाणे ‘उत्तरेकडून आलेल्या अफजल खानाच्या फौजांनी’ सेनेच्या तोंडातला घास हिरावून घेतला. उद्धवजींचा इतिहास कच्चा असल्यामुळे त्यांनी अफजल खानाला उत्तरेकडून आणले. त्यावर टीका झाली. तेव्हा त्यांनी आपली चूक दुरुस्त केली नाही. संजय राऊतना झापले. ‘अशी चुकीची माहिती कशी दिलीस?’ अशा शब्दात त्यांनी खडसावल्याची ‘मातोश्री’च्या गडावरची बातमी आहे.
आताच्या देवदर्शन कार्यक्रमात ६१ आमदारांना घेऊन गेलेल्या उद्धवजींनी ‘पुढच्या वेळी येईन तेव्हा १८० आमदारांना घेऊन येईन,’ असे सांगितले आहे. एकविरा देवी येणा-या भक्तांचे ऐकून घेत असते. ते जे नवस बोलतात तोही एकविरा मातेपर्यंत पोहोचतो. पण, एकविरा मातेची प्रतिक्रिया येत नसते. तशी प्रतिक्रिया लगेच मंदिरातून मिळण्याची व्यवस्था असती तर एकविरा मातेने उद्धवजींना लगेच विचारले असते, ‘उद्धव बाळा, आता ६१ घेऊन आला आहेस आणि ११९ आमदार कुठून आणणार आहेस? कोणता पक्ष फुटणार आहे? तुझ्याकडे १८० व्हायचे असतील, तर काँग्रेसचे ४२, राष्ट्रवादीचे ४१, अपक्ष २० असे सगळे जरी तुझ्याबरोबर आले, तरीही १८० संख्या होत नाही. शिवाय यापैकी एकही जण तुझ्याबरोबर येणार नाही. मग १८० आकडा गाठायचा तर भाजपाच्या १२३ पैकी ११९ जण तुझ्याबरोबर यावे लागतील. तेव्हा १८०चा आकडा तुला गाठता येईल.’ चिरंजीव आदित्य याची निवडणुकीच्या अगोदरची घोषणा ‘कोणत्याही परिस्थितीत १५१’ अशी होती. त्या घोषणेतसुद्धा उद्धवजींच्या आजच्या हिशोबाने २९ आमदार कमीच होते. आता आदित्यच्या आकड्यापेक्षा उद्धवजींनी २९ची भर घालून १८०पर्यंत आकडा नेला. पण हा आकडा जमावा कसा? भाजपाचे जे १२३ आमदार आले, त्या भाजपाला १४५चा बहुमताचा आकडा गाठतानाही दमछाक झालेली आहे आणि तो आकडा गाठताना कठीण जाऊ नये म्हणून राजमान्य, राजर्षी शरद पवार यांच्या ४१ सरदारांना त्या दिवशी सभागृहात हजर राहण्यास बंदी करण्यात आलेली होती. ती घोषणा राष्ट्रवादीकडूनच करून घेण्यात आली. त्यामुळे बहुमताच्या दिवशी १२३च्या आकड्याच्या जोरावरच विश्वास ठराव जिंकला, अशी हाळी देता येईल.
एकविरा देवीच्या दर्शनाने ६१चे १८० होणार असतील, तर तो एक चमत्कारच म्हणावा लागेल. पण, या विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमताची घोषणा करून ‘मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल,’ असे सांगणा-या उद्धवना आता भाजपाच्या मागे फरफटत जावे लागत आहे. सभा मोठ्या झाल्या तेव्हा त्यांना वाटले होते की, आता आपण ‘मातोश्री’वरून थेट ‘वर्षा’वर पोहोचलोच. पण, भाषण आणि व्यवहार यात काय फरक असतो, ते निवडणूक निकालात स्पष्ट झाले. १९९५च्या निवडणुकीत स्वत: बाळासाहेब ठाकरे असताना सेनेला बहुमत मिळू शकले नव्हते. पण सर्वाधिक ७३ जागा सेनेने मिळवल्या होत्या तर ६५ जागा भाजपला मिळाल्या होत्या. त्यावेळी ही अशीच त्रिशंकू अवस्था होती. सरकार बनवायला अपक्षांची रसद हवी होती. गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीमुळे या दोघांच्या बैठकीनंतर काँग्रेस सरकार स्थापन करू शकत नाही म्हणून विलासरावांनी हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली अपक्षांची ही फौज युतीच्या मदतीला पाठवून सरकार स्थापन झाले. बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व असताना सेनेला १८०चा आकडा गाठता आला नाही. तो आकडा सोडून द्या. १९९५ला जेवढा आकडा गाठला, त्या आकड्यापेक्षाही दहा जण कमीच निवडून आले. आता १८० आकडा होणार कुठून आणि कसा? एकविरा देवीचे दर्शन घेऊन ६१चे १८० होण्याची जादू अस्तित्वात नाही. मग हा आकडा गाठणार कसा? एकविरा देवी मनात म्हणत असेल की, ‘अपेक्षा ठेवून दर्शनाला येऊ नका. काही मागण्यासाठी येऊ नका. निर्मळ मनाने आणि श्रद्धेने यायचे असेल तर या..’
इकडे उद्धव ठाकरे एकविरा देवीच्या दर्शनाला ६१ आमदारांसह गेले, तिकडे नागपुरात ‘टेकडी गणपती’च्या दर्शनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटेच गेले. त्यांनी काही १२२ आमदारांना बरोबर घेतले नाही. १२२ जणांचे ते १२३वे प्रतिनिधीच आहेत. त्यांनीही टेकडीच्या गणपतीजवळ काय मागणे मागितले ते कळले नाही. स्वतंत्र विदर्भाचे राज्य हवे, असेही ते मनात म्हणाले असतील. पण, टेकडीच्या गणपतीने आशीर्वाद दिला तरीही हे राज्य होणे शक्य नाही. महाराष्ट्राची जनदेवता ते होऊ देणार नाही. दुसरी एक शक्यता अशी आहे की, फडणवीस यांनी खडसेंनी व्यक्त केलेल्या ‘बहुजनांचा मुख्यमंत्री’ या शक्यतेच्या विरोधात टेकडी गणपतीने कौल द्यावा, असे मागणेही मागितले असेल. सामान्यपणे मुख्यमंत्री जेव्हा देवदर्शनाला जातात, तेव्हा दर्शन झाल्यावर नेहमी सांगत असतात की, ‘महाराष्ट्रावरचे दुष्काळाचे संकट दूर होऊ दे.. महाराष्ट्र समृद्ध होऊ दे.. पाऊस पडू दे..’ फडणवीस यांनी काय मागणे मागितले ते त्यांनी सांगितलेले नाही. त्यामुळे फडणवीस यांचे देवदर्शन हे त्यांची खुर्ची मजबूत होण्यासाठीच असले पाहिजे. खडसे, तावडे आणि मुनगंटीवार यांनी फटाके लावू नयेत, अशी एक सुप्त मागणी त्यांनी टेकडीच्या गणपतीला केली असेल. आता एकविरा देवी उद्धवना पावते का, हे दिसेलच आणि टेकडीचा गणपती देवेंद्रना काय आशीर्वाद देतात, तेही पाहता येईल.
[EPSB]
भूगोल बदलू नका!
महाराष्ट्राचे नवे तरुण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांना मिळालेल्या घटनादत्त अधिकाराच्या बाहेर काही भाष्य करू लागले आहेत. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून आणि जवळपास सलग पाच वर्षाच्या अतिशय प्रखर संघर्षातून निर्माण झालेल्या अखंड संयुक्त महाराष्ट्राचे ते भाजपाचे पहिले मुख्यमंत्री आहेत.
[/EPSB]