मुरबाडमधील म्हसा गावामध्ये दूषित पाण्याने तापाची साथ पसरली असून आतापर्यंत १८०हून अधिक जणांना त्याची लागण झाली आहे.
मुरबाड- मुरबाडमधील म्हसा गावामध्ये दूषित पाण्याने तापाची साथ पसरली असून आतापर्यंत १८०हून अधिक जणांना त्याची लागण झाली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली असताना जिल्हा आरोग्य यंत्रणेचा अधिकारी किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी या गावाकडे फिरकला नसल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. म्हसा येथे भरणा-या यात्रेनिमित्त हजारो भाविक गावात आले होते. येथे साचलेली घाण व कचरा वेळेवर हटवली गेली नसल्याने येथील जलस्त्रोत दूषित झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
मुरबाडपासून अवघ्या १२ किमी अंतरावरील म्हसा गाव दरवर्षी म्हसा यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी गजबजून जातो.
यंदाही यात्रेसाठी महाराष्ट्रातून हजारो भाविक आले होते. मात्र यात्रेनिमित्त पडलेली घाण व कचरा वेळेत न हटवला गेल्याने येथे असलेल्या जलस्त्रोतामधील पाणी दूषित झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यात्रेदरम्यान गाव परिसरात पडलेला कचरा व घाण ठिकठिकाणी तशीच पडून राहिली असून गटारेही तुंबली आहेत. विशेष म्हणजे ५७ लाखांच्या नळपाणीपुरवठा योजनेचे काम रखडल्याने गावक-यांना विहिरीतील दूषित पाणी पिण्यापलीकडे पर्याय उरलेला नाही. त्यामुळे १८०० लोकसंख्या असलेल्या या गावात टायफॉइडच्या तापाची साथ पसरली आहे. गावक-यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असताना गटविकास अधिकारी फोनवर बोलण्यासाठी उपलब्ध होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यात्रेनंतर पसरलेल्या घाणीबाबत विचारणा केल्यावर ग्रामसेवक संजय हुमणोंकडून उडवाउडवीचे उत्तरे ऐकायला मिळत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तापाच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिका-यांना माहिती देण्यात आली होती. मात्र कुणीही म्हसा गावाकडे फिरकले नसल्याचे रहिवाशांनी सांगितले.
तापाची साथ दूषित पाण्यामुळेच आली आहे. डेंगू, मलेरियाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही साथ लवकरच आटोक्यात येईल. – डॉ. एस. एन. मडकवाड, म्हसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी
तापाच्या साथीचा प्रादुर्भाव होऊनही मुजोर ग्रामसेवक, गटविकास अधिका-यांनी गावातील अस्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे. गटविकास अधिका-यांनी फोनही बंद ठेवला आहे. – विनायक ढमणे, ग्रामस्थ, म्हसा
रुग्णालयाला पाणीपुरवठा करणा-या बोअरवेलजवळ अस्वच्छता पसरवली जाते. त्यामुळे येथे उपचार घेणा-या रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. – मगन घागस, सामाजिक कार्यकर्ते, म्हसा