देशात दरवर्षी ३ कोटी लोक दूषित पाण्यामुळे आजारी पडतात. त्यातही दूषित पाण्याचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक आहे, अशी खळबळजनक माहिती केंद्रीय पेयजल राज्यमंत्री रामकृपाल यादव यांनी दिली.
नवी दिल्ली- देशात दरवर्षी ३ कोटी लोक दूषित पाण्यामुळे आजारी पडतात. त्यातही दूषित पाण्याचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक आहे, अशी खळबळजनक माहिती केंद्रीय पेयजल राज्यमंत्री रामकृपाल यादव यांनी दिली. ऑनलाईन व्यवस्थापन पद्धतीने देशाच्या विविध भागात पाण्याचे नमुने घेतले. या पाण्यात क्षार, लोह, नायट्रेटचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक आढळले.
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात यादव म्हणाले की, देशातील ग्रामीण भागातील ३.६ कोटी जनता दूषित पाणी पिते. पाण्यातील दूषित द्रव्यांमुळे लहान मुलांच्या वाढीवर परिणाम होत आहे. पाण्यात जस्ताचे प्रमाण आढळल्याने कर्करोग होऊ शकतो.
जनतेला स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवावे यासाठी सर्व राज्यांना आदेश दिले आहेत. त्यासाठी पाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यास सांगितले आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीला रोज ८ ते १० लिटर स्वच्छ पिण्याचे पाणी आणि जेवणासाठी पाणी पुरवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील जनतेला स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी २७५८.४५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. येत्या २०२२ पर्यंत ग्रामीण भागातील जनतेला पाईपद्वारे पाणीपुरवठा करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्राने हाती घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.