दुस-या सराव परीक्षेतही भारताचा संघ पैकीच्या पैकी मार्क मिळवून पास झाला.
अॅडलेड- दुस-या सराव परीक्षेतही भारताचा संघ पैकीच्या पैकी मार्क मिळवून पास झाला. गोलंदाजांपाठोपाठ फलंदाजांनी चांगली कामगिरी करत चार लढतींच्या कसोटी मालिकेपूर्वी उत्तम सराव केला. क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) संघाविरुद्धचा दोन दिवसीय सराव सामना अपेक्षेप्रमाणे अनिर्णित राहिला तरी फलंदाजी बहरल्याने भारताने पहिल्या डावात शुक्रवारी ३७५ धावांचा डोंगर उभारला.
सलामीवीर मुरली विजयसह (६०) विराट कोहली (६६), अजिंक्य रहाणे (५६), वृद्धिमन साहा (५१) आणि रोहित शर्माने (४८) फलंदाजीचा चांगला सराव करताना पहिल्या डावात मोठी आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. वैयक्तिक चार अर्धशतकांसह विजय आणि कोहलीची तिस-या विकेटसाठीची १२३ आणि रोहित आणि अजिंक्यची पाचव्या विकेटसाठीची ९३ धावांची भागीदारी पाहुण्यांच्या लांबलेल्या डावाचे प्रमुख वैशिष्टय ठरले.
पहिल्या डावात १३२ धावांनी पिछाडीवर असलेल्या सीए संघाने दुस-या दिवसअखेर दुस-या डावात ५ बाद ८३ धावा केल्या. मध्यमगती इशांत शर्माने दोन तर उमेश यादव, वरुण आरोन आणि करन शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक : क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) – २४३ आणि ५ बाद ८३ वि. भारत – पहिला डाव (२ बाद ९९ वरून) सर्वबाद ३७५ (विजय ६०, कोहली ६६. रहाणे ५६, साहा ५१, लॅगोर ५९-४). निकाल : लढत अनिर्णित.