मतदार यादीतून नावे गायब झालेल्या मतदारांनी सलग दुस-या दिवशीही जिल्हाधिका-यांना घेराव घालत फेरमतदानाची मागणी केली.
पुणे – मतदार यादीतून नावे गायब झालेल्या मतदारांनी सलग दुस-या दिवशीही जिल्हाधिका-यांना घेराव घालत फेरमतदानाची मागणी केली. दरम्यान, मतदानानंतर गुरुवारी रात्री शेकडो पुणेकरांनी जिल्हाधिका-यांच्या कार्यालयात आंदोलन करून जाब विचारला होता. मात्र, जिल्हाधिकारी सौरव राव यांना पुणेकर मतदारांना समाधानकारक उत्तर देता आले नव्हते. त्यामुळे पुणेकर संतप्त झाले आहेत.
मतदारयादीतून नावे वगळण्यात आलेल्या नागरिकांनी कौन्सिल हॉल येथे सुरू केलेल्या आंदोलनात राजकीय पक्षांनीही उडी घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केल्याने कौन्सिल हॉल परिसराला छावणीचे स्वरूप आले. या वेळी घोषणांनी कौन्सिल हॉल परिसर दणाणून सोडला होता. पुणे महापालिकेच्या दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर आपोआप आमची नावे का वगळण्यात आली, असा सवाल हातातील मतदान ओळखपत्रे दाखवत संतप्त नागरिकांनी उपस्थित केला.
पुण्यातील कोथरूड, कॅन्टोंमेंट आणि पेठांच्या परिसरात अनेक नागरिकांची नावे मतदार यादीतून गायब असल्याच्या तक्रारी गुरुवारी दुपारपासून येऊ लागल्या होत्या. सुमारे लाखभर मतदारांची नावे यादीत नसल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. बहुतेक लोक वर्षानुवष्रे त्याच पत्त्यावर राहत असताना त्यांची नावे कशी काय गायब होतात, असा प्रश्न या मतदारांनी उपस्थित केला. नवमतदारांची नावे येतात, मग जुन्या लोकांची नावे का वगळली गेली, असाही प्रश्न मतदारांनी जिल्हाधिकारी राव यांना केला आहे.
सदोष मतदार याद्यांसंदर्भात तक्रारींची दखल घेण्यात आली आहे. राज्याच्या निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठवण्यात येणार आहे. त्यावर विचार करून अंतिम निर्णय घेण्यात येईल. – सौरव राव, जिल्हाधिकारी