राज्यातील दुष्काळ निवारणाच्या कामातील गैरव्यवहारावर नजर ठेवण्यासाठी देखरेख समिती स्थापणार असल्याची घोषणा भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुंबई- राज्यातील दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी प्राधान्य देणार असून, दुष्काळ निवारणाच्या कामातील गैरव्यवहारावर नजर ठेवण्यासाठी भाजपची देखरेख समिती स्थापणार असल्याची घोषणा भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली. भाजपमधील सर्व नेत्यांनी एकमताने आपली निवड केल्याने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वाचे सहकार्य लाभेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मंगळवारी प्रथमच फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासंबंधी आपला प्राधान्यक्रम असून, विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे ते म्हणाले. दुष्काळ निवारणाच्या कामात काही अपप्रवृत्ती वैयक्तिक स्वार्थ साधताना दिसत आहेत. या गैरप्रकारांवर नजर ठेवण्यासाठी खासदार रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. दुष्काळग्रस्त असलेल्या प्रत्येक जिल्ह्यांत या समितीचे सदस्य असतील. ते त्यांचा अहवाल दानवे यांच्याकडे सादर करतील, असेही फडणवीस यांनी सांगितले.
दुष्काळग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा लढा सुरूच राहील. यापूर्वी मुंडे, मुनगंटीवार, एकनाथ खडसे, विनोद तावडे यांनी दुष्काळग्रस्त भागाचे दौरे केले असून, आता आपणही त्या भागाचा दौरा करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. संपूर्ण दुष्काळी भागातील परिस्थितीचा एक अहवाल तयार केला जाणार असून, तो संसदेतील आमच्या दोन्ही विरोधी पक्षांना देण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले. भाजपचे अधिवेशन मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात मुंबईत होणार असून, तोपर्यंत भाजप प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.