दुष्काळ, शेतक-यांच्या आत्महत्या आदी विषयांवर काँग्रेसने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आक्रमक भूमिका घेतली.
नागपूर – दुष्काळ, शेतक-यांच्या आत्महत्या आदी विषयांवर काँग्रेसने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे विधान परिषदेचे कामकाज अर्धा तासासाठी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी तहकूब केले. काँग्रेसची आक्रमक भूमिका बघून सरकारनेही यावर चर्चेची तयारी दाखवली आहे. मात्र ही चर्चा मंगळवारी होण्याची शक्यता आहे.
सोमवारी हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. तेव्हापासूनच काँग्रेसने दुष्काळ आणि शेतक-यांच्या आत्महत्येबाबत आक्रमक भूमिका घेतली. विधान भवन परिसरात काँग्रेस आमदार, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राधाकृष्ण विखे-पाटील, विजय वडेट्टीवार, मधुकर चव्हाण, भाई जगताप, कालिदास कोळंबकर, संजय दत्त, नितेश राणे यांच्यासह अनेक काँग्रेस आमदारांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत विधान भवनाच्या पाय-यांवर निदर्शने केली. त्यानंतर विधान परिषदेचे
कामकाज सुरू झाले. कामकाज सुरू होताच आमदार माणिकराव ठाकरे यांनी शेतक-यांच्या आत्महत्या आणि दुष्काळ आदी प्रश्नांवर नियम २८९ द्वारे चर्चेची मागणी केली. मात्र कामकाज पत्रिकेनुसार काम व्हावे, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. मात्र त्यावर ठाकरे यांनी जोरदार आक्षेप घेतला. हे सरकार शेतक-यांना मदत करत नाही. हे केवळ ढोंग करत आहेत, असा थेट आरोप त्यांनी सभागृहात केला. सरकारने शेतक-यांना विशेष पॅकेज द्यावे अशी मागणी त्यांनी केली.
या मुद्दय़ावर चर्चा झाली पाहिजे. त्यामुळे दैनंदिन कामकाज तहकूब करून दुष्काळावर चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. सरकार दुष्काळ, शेतक-यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावर गंभीर आहे. सरकारची याविषयी चर्चा करण्याची तयारी आहे. मात्र कार्यक्रम पत्रिकेवर क्रमानुसार कामकाज व्हावे, असे खडसे यांनी सांगितले. त्यामुळे ही चर्चा दुस-या दिवशी घेतली जावी. सरकार सर्व तयारीने त्याला सामोरे जाईल, असे ते म्हणाले. आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने गेल्या महिन्यात अनेक उपाययोजना केल्याचे खडसे यांनी सांगितले. मात्र आज शोकप्रस्ताव असल्याने त्यावर चर्चा केली जावी, अशी विनंती त्यांनी सभागृहात केली. मात्र शेतक-यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचे ठाकरे यांनी पुन्हा एकदा सभागृहात सांगितले.
या वेळी काँग्रेस आमदार आक्रमक झाल्यानंतर विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख यांनी मध्यस्थी केली. ठाकरे यांनी दुष्काळ व शेतक-यांच्या आत्महत्याविषयी नियम २८९ नुसार चर्चा करण्याची मागणी आपल्याकडे केल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. राज्याच्या दृष्टीने हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ात दुष्काळ असून त्यावर चर्चा झालीच पाहिजे. मात्र ती नियम २८९ नुसार करायची की २६० नुसार हे निश्चित करावे लागेल. यासाठी सभागृहाचे कामकाज अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आले. काँग्रेसची आक्रमक भूमिका लक्षात घेता या प्रस्तावावर मंगळवारी विधान परिषदेत चर्चा होण्याची शक्यता आहे.