भुवनेश्वर, साहा, बुमरापाठोपाठ अश्विनही जायबंदी
लंडन – वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा पाठोपाठ अनुभवी ऑफस्पिनर आर. अश्विन जायबंदी झाल्याने इंग्लंड दौ-यावर असलेल्या भारताच्या क्रिकेट संघाला आणखी एक धक्का बसला आहे. सराव सामन्यात अश्विनला दुखापत झाली असून, पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी जायबंदी झालेला अश्विन हा भारताचा चौथा खेळाडू आहे.
इंग्लंड दौ-यासाठी पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक म्हणून साहाचे नाव आघाडीवर होते. मात्र, आयपीएलनंतर तो जायबंदी झाला. त्याच्या अंगठय़ाला दुखापत झाली. बंगळूरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) साहा याच्यावर चुकीचे उपचार केले गेले आणि त्यानंतर त्याचा खांदा जायबंदी झाला. परिणामी, खांद्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. या दुखापतीतून सावरण्यासाठी साहा याला आणखी काही महिने लागणार आहेत. त्याच्या अनुपस्थितीत दिनेश कार्तिक याचा संघात समावेश झाला. कसोटी मालिकेद्वारे कार्तिकला स्वत:ला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी आहे.
साहानंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचा अंगठा दुखावला. झटपट मालिकेत तो सहभागी झाला होता. बुमरा याच्या अंगठय़ावर शस्त्रक्रिया झाली आहे. या दुखापतीतून सावरायला त्याला खूप वेळ लागणार आहे. स्विंग गोलंदाज भुवनेश्वरही कंबरदुखीने त्रस्त आहे. बुमरा आणि भुवनेश्वरमुळे वेगवान गोलंदाजी कमकुवत झाली आहे. मात्र, भारताची गोलंदाजीची भिस्त फिरकी मा-यावर असते. त्यात अनुभवी ऑफस्पिनर अश्विनवर सर्वाधिक मदार आहे. मात्र, तो जायबंदी झाल्याने संघ व्यवस्थापनासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
इसेक्सविरुद्धच्या सराव सामन्यातील पहिल्या दिवशी अश्विनच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. या दुखापतीनंतर अश्विनला फलंदाजी आणि गोलंदाजी करता आलेली नाही. अश्विनला विश्रांती दिली, असे अनेकांना वाटत होते. त्याच्या दुखापतीवर सध्या उपचार सुरू आहेत. अश्विनची दुखापत गंभीर स्वरूपाची नसल्याचे संघ व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अश्विन खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.