जीवन जगत असताना अनेक अडचणी येत असतात. या प्रवासात काहींच्या वाटय़ाला गरिबी येते. तर काहींच्या वाटय़ाला आई-वडिलांचे छत्र हरवते.
भुईबावडा – जीवन जगत असताना अनेक अडचणी येत असतात. या प्रवासात काहींच्या वाटय़ाला गरिबी येते. तर काहींच्या वाटय़ाला आई-वडिलांचे छत्र हरवते. स्वत: काही बोलावं तर बोलता येत नाही आणि दुस-यांचं ऐकून कृती करावी तर तेही नाही.
आपण धडधाकट जीव येणा-या संकटांना सामोरे जाताना किती कटकट करतो. मात्र जन्मापासून दु:खाचे बाळकडू पचवून परिस्थितीवर मात करणा-या फोंडके बंधूंची जिद्द पाहिली तर त्यांच्या जिद्दीला ख-या अर्थाने सलाम करावा लागेल.
सर्वाहून वेगळे असणारे नितेश व निलेश फोंडके यांनी आपण जिवंत आहोत हेच आपल्यासाठी पुरेसे आहे. नाही तर जगात जे चालले आहे, जे दिसते आहे ते भयानक आहे यात या स्वार्थी जगाचा आवाजच कानापर्यंत नको.. असे त्यांचे तत्त्वज्ञान समजून घेताना थक्क व्हायला होते.
हेत येथील नितेश ऊर्फ नारायण फोंडके (२५) व त्याचाच लहान भाऊ निलेश फोंडके हे दोन्ही भाऊ जन्मताच मुके व बहिरेपणा या आजाराला बळी पडले आहेत. त्यांच्या घरची परिस्थिती खूपच हलाखीची होती. आई सरिता फोंडके व वडील शिवाजी फोंडके गरिबीचा सामना करत संसाराचा गाडा हाकतात.
त्यांचे पुत्र नितेश व निलेशला बोलता येत नसल्याचे समजल्यावर घरच्यांवर मोठे संकट उभे राहिले. या गंभीर घटनेमुळे मुलांच्या चिंतेने शिवाजी फोंडके यांचे निधन झाले. संसाराचा पूर्ण आधार गेल्याने संपूर्ण जबाबदारी या मुलांच्या आईने घेतली. या परिस्थितीत मुलांना व मातेला भगवंतासारखे पाठीशी उभे राहणारे चुलते मिळाले.
विलास फोंडके यांनी या मुलांना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळले. पुतणे मुके-बहिरे आहेत, म्हणून त्यांनी त्यांना दूर केले नाही. जन्मत:च दु:खाचे बाळकडू मिळाल्याने या मुलांना त्यांनी आपल्या सोबत वेल्डिंग व्यवसायात मदत करण्यासाठी घेऊन जात. काकांचे काम बघून- बघून निलेश व नितेश वेल्डिंग कामात एवढे मग्न झाले आहेत की, सध्या ते काकांचा व्यवसाय स्वत: जबाबदारीने सांभाळत आहेत.
हेत येथे राहत्या घरी लोखंडाचे विविध प्रकारचे साहित्य त्यांच्या अंगी असणा-या कला गुणांनी तयार करत आहेत. या भागातील घरांचे लोखंडी छप्पर निलेश व नितेश स्वत: तयार करण्याचे काम घेत आहेत. परंतु बोलता न आल्यामुळे त्यांना लोकांशी संवाद साधताना अडचणी येत आहेत.
लहानपणापासून समाजात वावरताना अनेक अडचणी आल्या, प्रचंड हुशारी व समजूतदारपणा असूनदेखील केवळ त्यांच्या अपंगत्वामुळे या दोन्ही बंधूंना शाळेला प्रवेश दिला नाही. त्यावेळच्या शिक्षकांच्या एका निर्णयामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु जिद्दी स्वभावाच्या या दोन्ही भावांनी निराश न होता पहिलीच्या वर्गात शिक्षण अर्धवट सोडून घरी सराव करत स्वत:मध्ये लिहिता, वाचता येण्याची क्षमता निर्माण केली. सध्या ते चांगल्या प्रकारे वाचन व लिखाण करू शकतात. चाणाक्षपणा, सहनशीलता, जिद्द व चिकाटी स्वभावामुळे परिसरातील गावांमध्ये स्वत:च्या कलेची ओळख पटवून दिली आहे.
लहानपणी शाळेत चिडवणारे, त्यांच्या अपंगत्वाला हसणारी मुले आता याच बंधूंचा आदर्श ठेवत आहेत. वेल्डिंग व्यवसाय करत असताना अनेक प्रकारच्या कलाकुसर करून उद्योग वाढवत आहेत. परंतु त्यांच्या गोड स्वभावामुळे सध्या त्यांचा मित्रपरिवार देखील खूपच मोठा आहे.
त्यांच्या या कर्तृत्वात त्यांच्या चुलत्यांचे मोठे योगदान आहे. या जगात कोण कोणासाठी आर्थिक तोटा सहन करत नाही. परंतु परिस्थिती गरिबीची असतानाही स्वत:च्या तीन अपत्यांना व या कुटुंबाला त्याच्या काकांनी खंबीरपणे आधार दिला आहे.