दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडीला मध्य रेल्वेच्या हद्दीत नागोठणे व रोहा स्थानकांदरम्यान अपघात घडून १९ जणांचा बळी गेलेल्या या घटनेचा अहवाल समोर येणे कठीण झाले आहे.
मुंबई- दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडीला मध्य रेल्वेच्या हद्दीत नागोठणे व रोहा स्थानकांदरम्यान अपघात घडून १९ जणांचा बळी गेलेल्या या घटनेचा अहवाल समोर येणे कठीण झाले आहे. या अपघाताची चौकशी करणारे मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्शी मागील आठवडयात निवृत्त झाल्याने हा अहवाल गुलदस्त्यातच राहण्याची शक्यता आहे.
रेल्वे अपघाताच्या तीव्रतेनुसार त्यातील मनुष्यहानी विचारात घेता कायदेशीर चौकशी केली जाते. अशा चौकशीचा केवळ प्राथमिक अहवाल प्रसारमाध्यमांसमोर सादर करण्यात येतो. अशी माहिती रेल्वेतील वरिष्ठ अधिका-याने दिली.
दिवा-सावंतवाडी या पॅसेंजर गाडीला ४ मे २०१४ रोजी नागोठणे आणि रोहा स्थानकांदरम्यान झालेल्या अपघातानंतर जखमींना मुंबईच्या केईएम आणि शीव रुग्णालयात पोहोचवण्यासाठी उशीर झाल्याने मोठया प्रमाणात टीकेची झोड उठली होती. त्यानंतर अपघातातील जखमींना तात्काळ उपचार मिळण्यासाठी एअर अॅम्ब्युलन्स (हेलिकॉप्टर)चा वापर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते.
या अपघाताची संपूर्ण चौकशी मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्शी यांनी केली होती. त्यानंतर बक्शी यांनी अपघातातील प्रत्यक्षदर्शीचे जबाबही नोंदवून घेतले होते. बक्शी यांनी याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण करीत हा अहवाल मध्य रेल्वेकडे सुपूर्द केला आहे.
त्यामुळे सुरक्षा आयुक्त चेतन बक्शी यांनी निवृत्तीपूर्वीच आपला गोपनीय अहवाल रेल्वे प्रशासनाला सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता हा अहवाल प्रसारमाध्यमांसमोर येणार की नाही यावर शंका उपस्थित करण्यात येत आहे.