माथेरानची गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी आणि लाल मातीतील रानावनात फिरण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे.
नेरळ- माथेरानची गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी आणि लाल मातीतील रानावनात फिरण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. दिवाळीपासून माथेरानचा पर्यटन हंगाम सुरू होतो. यावेळी देखिल दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी यंदाही पर्यटकानी गर्दी केली आहे. येथील सर्व हॉटेल आणि निवासाची ठिकाणे पर्यटकांनी भरली आहेत. त्यातही नेरळ-माथेरान मिनीट्रेनचा डौलही कायम आहे.
दिवाळी हंगामातील सुटीचा आनंद वाढवण्यासाठी माथेरानमध्ये आलेल्या पर्यटकांची गर्दी झाली आहे. रात्र, मध्यरात्रीही पर्यटक माथेरानातील बाजारपेठेत फिरताना दिसत आहेत.
तर सायंकाळी येथील श्रीराम मंदिर चौक, रिगल नाका, फन टाइमनाका, पिसरनाथ मार्केट, कोतवाल मार्केट, शिवाजी महाराज उद्यान, तसेच कपाडिया मार्केट भागात मोठी गर्दी होत आहे.
तर माथेरानची प्रसिद्ध चिक्की आणि चामडय़ाच्या वस्तूखरेदीसाठीही पर्यटकांची झुंबड होत आहे. घोडय़ावरून सैर करण्यासाठीही रांगा लागत आहेत.
सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्यासाठी सनसेट पॉइंट आणि पनोरमा पॉइंट येथे जाण्यासाठी पर्यटक घोडेस्वारीसाठी आगाऊ नोंदणी करत आहेत. माथेरानचे ग्रामदैवत असलेले पिसरनाथ मंदिर आणि त्या परिसरात असलेले शाल्रेट लेकवर पर्यटक दिवसभर गर्दी करून आहेत. त्या भागात असलेल्या डेंजर पथ आणि तेथून पुढे ऑलपीया रेसकोर्स तसेच वनट्री हिल पॉइंटसाठी हौशी पर्यटक घोडय़ावर रपेट करत आहेत. तर माथेरानचे आकर्षण असलेले एको पॉइंट, लुइजा पॉइंट येथे नेहमीप्रमाणे पर्यटकांची गर्दी आहे. पे मास्टर पार्क तसेच बाजारपेठेतही गर्दी आहे.
ब्रिटिशांच्या काळात मुंबईपासून जवळ असलेले घाटमाथ्यावरील रान शोधून काढण्यात आले. नंतर मुंबईपासून सर्वात जवळ असलेले पर्यटनस्थळ म्हणून माथेरानची ओळख झाली.
तेथील लाल मातीचे रस्ते आणि गर्द हिरवाई यामुळे माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी कायम असते. दिवाळी आणि सुटीच्या दिवसांत त्यात भर पडते. पर्यावरण आणि निसर्गसौंदर्य अबाधित रहावे म्हणून प्रदुषण करणा-या वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. ब्रिटिश काळापासून माथेरानमध्ये प्रवासी वाहनांना बंदी आजही कायम आहे. उन्हाळ्यातही शाळांच्या सुटय़ांमुळे माथेरान गजबजलेले असते. तर हिवाळी पर्यटनासाठी माथेरानमध्ये हॉटेल, दुकानदार यांची लगबग सुरू झाली आहे.
झुकझुकगाडी रद्द झाल्याने हाल
माथेरानची आणि पर्यटकांची लाडकी नेरळ-माथेरान मिनीट्रेनसाठी पर्यटकांच्या पहाटेपासून रांगा लागत आहेत. मात्र अमलॉज ते माथेरान दरम्यान मिनीट्रेनची शटलसेवा सुरू असल्याने त्याचा फायदा पर्यटकांना होत आहे. नेरळ-माथेरान घाट रोडने प्रवासी टॅक्सी आणि खासगी वाहने माथेरान दस्तूरीनाका येथे येत असल्याने घाट रस्त्यात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी दूर करण्यासाठी नेरळ आणि माथेरान पोलीस प्रयत्न करत आहेत. शनिवारी दुपारी साडेबाराला नेरळ येथून सुटणारी मिनीट्रेन रद्द करण्यात आली. त्यामुळे सकाळपासून तिकिटासाठी रांगा लावून थांबलेल्या पर्यटकांचे हाल झाले. तीन ते चार तासांच्या प्रतिक्षेनंतर नेरळस्थानकातून टॅक्सीस्टँडला जावे लागले. तर त्याचवेळी लहान मुलांसह माथेरानला निघालेल्या पर्यटकांना अन्य वाहनाचा पर्याय शोधावा लागला.
नेरळ-माथेरान घाटरस्त्यावर कायम वाहतूक कोंडी
मुंबईजवळ असलेल्या माथेरान पर्यटनस्थळी दिवाळी सुटीमुळे पर्यटकाची सध्या प्रचंड गर्दी आहे. मात्र, घाटरस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीने पर्यटक त्रस्त झाले आहेत. रोजच अध्र्या घाटरस्त्यावर पर्यटकांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. या ठिकाणी माथेरान नगरपालिकेने प्रशस्त वाहनतळ उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. तर सरकारने माथेरान पालिकेला वाहनतळ उभारण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
नेरळ-माथेरान मिनीट्रेन १९०७ मध्ये सुरू झाल्यानंतर माथेरानसाठी हा एकमेव वाहतुकीचा मार्ग होता. मात्र १९७८ मध्ये रेल्वेचा संप झाल्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून नेरळ-माथेरान घाट रस्त्याची निर्मिती स्थानिकांनी श्रमदान करून केली. त्यानंतर पर्यटकांची गर्दी वाढत गेली. आता हा रस्ताही अपुरा ठरत आहे.
नेरळ-माथेरान घाटरस्त्यावर गाब्रेट वाडीफाटा पासून दररोज कोंडी होते. पर्यटन हंगामात ही नित्याचीच बाब असते. माथेरान-दस्तूरी नाका येथे असलेली खासगी वाहनाची पाìकग दररोज फुल होत आहे. त्यामुले पर्यटक कोणतीही माहिती न घेता नेरळ-माथेरान घाटरस्त्यातच आपली वाहने लावून दस्तुरी नाका गाठतात. यामुळे प्रवासी टॅक्सीसेवेवरही त्याचा परिणाम होत आहे. तर या नित्याच्या वाहतूक कोंडीमुळे नेरळ पोलीसही हैराण झाले आहेत.
पार्किंगसाठी पालिकेकडे पुरेशी जागा नाही
माथेरानच्या दस्तुरी नाक्यावर असलेली पाìकगची जमीन सरकारने माथेरान पालिकेला उपलब्ध करून देण्याची गरज आहे. माथेरान पालिकेकडून अनेक वर्षापासून दस्तूरी नाका परिसरातील बोरीचा माळ येथील भूखंडांची सरकारकडे मागणी होत आहे. या भूखंडाचा वापर होत नाही. ही जमीन पर्यटकांना वाहन पार्किंगसाठी मिळावी यासाठी पालिकेने हा विषय रेटून धरणे आवश्यक आहे. तर वनविभागाकडून पर्यटकांकडून वाहनतळ कर वसूल केला जातो. मात्र, त्या तुलनेत पार्किंगसाठी पुरेशी सुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे.