आमच्या मालवणी मुलुखातील एकुलता एक महत्त्वाचा सण म्हणजे ‘चवथीचा’ सण आणि एकुलता एक उत्सव म्हणजे मागशीर्ष महिन्यातील ग्रामदेवतेची जत्रा -‘दहीकाला’. हे दोन दिवस साजरे करण्यासाठी आमचा मालवणी माणूस जीवाचे रान करीत असतो. खरं म्हणजे धार्मिक सण आणि उत्सव ख-या अर्थाने सामान्य माणसांसाठीच असतात. अहोरात्र काबाडकष्ट करण्यातच ज्यांचे उभे आयुष्य संपते, त्यांच्या वाटयाला वर्षातून एखादा दिवस थोडया विश्रांतीचा, थोडयाशा आनंदाचा आणि सर्वानी एकत्र येऊन साजरा करावा असा यावा आणि त्या दिवसाचे बळ घेऊन त्याचे नेहमीचे रडत रखडत चाललेले जिणे-जगणे अधिक सुसहय़ व्हावे या हेतूने तत्कालीन समाजधुरिणांनी या सणांची आणि उत्सवाची परंपरा घालून दिली असावी!
आमच्या मालवणी मुलुखातील एकुलता एक महत्त्वाचा सण म्हणजे ‘चवथीचा’ सण आणि एकुलता एक उत्सव म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील ग्रामदेवतेची जत्रा -‘दहीकाला’. हे दोन दिवस साजरे करण्यासाठी आमचा मालवणी माणूस जीवाचे रान करीत असतो.
खरं म्हणजे धार्मिक सण आणि उत्सव ख-या अर्थाने सामान्य माणसांसाठीच असतात. अहोरात्र काबाडकष्ट करण्यातच ज्यांचे उभे आयुष्य संपते, त्यांच्या वाटयाला वर्षातून एखादा दिवस थोडया विश्रांतीचा, थोडयाशा आनंदाचा आणि सर्वानी एकत्र येऊन साजरा करावा असा यावा आणि त्या दिवसाचे बळ घेऊन त्याचे नेहमीचे रडत रखडत चाललेले जिणे-जगणे अधिक सुसहय़ व्हावे या हेतूने तत्कालीन समाजधुरिणांनी या सणांची आणि उत्सवाची परंपरा घालून दिली असावी!
आपल्या या मालवणी मुलखात जे इतर काही सण आणि उत्सव आहेत. त्यांची योजनाही तत्कालीन सामाजिक, धार्मिक गोष्टींचा सखोल विचार करणा-या विचारवंतांनी खूपच विचारपूर्वक आणि समाजातील बहुजनांच्या घटकाला डोळयांसमोर ठेवून निर्माण केलेली आढळते.
समाजातील काही मोजक्या श्रीमंतांच्या घरात ज्या पक्वानांचा आस्वाद त्यांच्या कुटुंबातील आबालवृद्धांना सहजासहजी आणि कोणत्याही घडीला घेता येतो, त्या पक्वानांचे ज्यांना दर्शनही दुर्लभ आहे अशा गोरगरिबांना निदान एखाद्या दुस-या दिवशी सणावारांच्या निमित्ताने ती पक्वान्ने त्यांच्या वाटयाला यावीत आणि त्यांनीही वर्षातून काही मोजके दिवस तरी आपल्या भागात आढळून येणा-या पक्वान्नांची चव घेण्याची निदान संधी प्राप्त व्हावी आणि तो आपल्या शेजा-या-पाजा-यासंह साजरा करता यावा यासाठीच या सणावारांची निर्मिती असावी.
त्यांतही आणखी एक गंमत आहे. ती फक्त आपल्याच प्रदेशात अथवा भूभागात आहे असे नाही. ती गंमत सर्व प्रादेशिक विभागांत आहे. एखाद्या भागात ज्या प्रकारची पिके घेतली जातात त्या पिकांमधून मिळणा-या धांन्यानीच हे सण करावयाचे असतात.
देशावर गहू हे महत्त्वाचे पीक. त्यामुळे त्या भागातील सणांसाठी बहुतेक पक्वान्ने गव्हापासूनच बनविलेली असणार. आणि त्याच नियमाने कोकणसारख्या तांदळाचे पीक घेणा-या भूभागातील सणांची वेगवेगळी पक्वान्न तांदळापासून बनविलेली असावयाची हे उघडच आहे.
आमच्या मुलखातील वेगवेगळया छोटया-मोठया सणांसाठी विविध प्रकारची ठरलेली पक्वान्ने आढळून येतात. त्या सर्व पक्वान्नांचा आस्वाद गोरगरीब आबालवृद्धांना घेता यावा हाच या सणामागे योजनापूर्वक केलेला विचार आहे.
एकूण सणांची योजना ही सर्वसामान्य गरीब माणसाच्या विचारातून निर्माण झालेली, देवा-धर्माचे अवगुंठण असलेली, सामाजिक अनुष्ठाणावर आधारलेली आणि पायाशुद्ध विचारांची परिपक्व अशी प्रौढता लाभलेली एक पारंपरिक निर्मिती आहे.
माणूस तो गरीब असो की श्रीमंत, तो उत्सवप्रिय प्राणी आहे; किंबहुना त्याच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून त्याला थोडी स्वस्थता लाभावी, त्याच्यातील धर्मासंबंधीची, देवासंबंधीची श्रद्धा वाढीला लागावी आणि सण, उत्सव साजरे केल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने जीवन संघर्षाला सामोरे जाण्याची त्याच्यात ताकद निर्माण व्हावी हाच सण आणि उत्सवाच्या मागचा विचार आहे. त्यामुळे सण आणि उत्सव साजरे करण्याच्या परंपरेमध्ये वैविध्य आहे.
सणांच्या बाबतीत सांगावयाचे झाल्यास मालवणी मुलुखातले वेगवेगळे सण वेगवेगळया पक्वान्नांची योजना करू न साजरे केले जातात आणि त्या त्या सणाला त्या – त्या देवताना त्या पक्वान्नांचा नैवेद्य दिला जातो. नागपंचमीला दूध-लाह्या आणि खिरीचा नैवेद्य दिला जातो. तसाच गोकुळाष्टमी, दसरा, दिवाळी, शिमगा, संक्रांत हे सण स्थानिक पिकांचा विचार करूनच विविध अशा गोडधोड पदार्थानी साजरे केले जातात. त्याशिवाय येथील सर्वसामान्य शेतक-याच्या, त्याच्या शेतीसंबंधीच्या कामाच्या हंगामावर आधारलेले काही सण वेगळे असे आहेतच. साधारणत: मृग नक्षत्रापासून त्यांच्या पेरणीच्या कामाची सुरुवात होते आणि अशा सणांचीही सुरुवात त्याच दिवसापासून होते.
मालवणी मुलुखातील शेतकरी भात लावणीचे त्याचे काम संपले की, त्याच्या वैशिष्टय़पूर्ण पद्धतीची ‘चिखलधुणी’ तो साजरी करतो. सरत्या आषाढातील अमावास्येला तो ‘गटारी अमावास्या’ म्हणतो आणि ती तशी शब्दश: साजरी करण्यात तो धन्यता मानतो.
या सगळया सणांत तो जास्तीत जास्त आतुरतेने वाट पाहात राहातो तो फक्त चवथीच्या सणाची! आता आपल्या दैनंदिन जीवनाला प्राप्त परिस्थितीमुळे एक नवे आणि एक वेगळे रूप प्राप्त झाले असले तरी साधारणत: तीन-चार दशकांच्या मागील काळात आमच्या मालवणी मुलुखातील गणेश चतुर्थीच्या सणाचे रूप लक्षात घेण्यासारखे असायचे.
नागपंचमीपासून या सणाचा पायरव सुरू व्हावयाचा. गणेशमर्ती तयार करणारे वाडी-वाडीतील काही ठरावीक मूर्तिकार, नागपंचमीपासून आपल्या कामाला सुरुवात करावयाचे. जस जशी गणेश चतुर्थी जवळ यावयाची तसतशी त्या मूर्तिकाराची धांदल, गडबड वाढत राहायची. पण त्याच्या हाताखाली वावरणारी शिकावू माणसे मन एकाग्रतेने कामाला जुंपून घ्यायची! बाहेर कधी धुवांधार पाऊस कोसळत असायचा; कधी गावाशेजारच्या नदीला महापूर यावयाचा, कधी कोणाची भांडणे विकोपाला जायची. हया सगळया घटनांकडे या मूर्तिकारांचे लक्षच नसायचे! ते एका वेगळयाच विश्वात तल्लीन झालेले असायचे. आवाठा-आवाठात पोरी-सोरी, माहेरवासिणी एकत्र यायच्या, फुगडयांचे मेळ जमायचे.
शेतातून दमून भागून आलेला शेतकरी अंथरूणावर पडल्या पडल्या त्याला या फुगडयांच्या गीतातील ‘श्रीयाळ चांगुणांच्या’ कथा ऐकताना त्याला झोपेचा विसर पडायचा!
भात लावणीच्या हंगामात ‘परशा’ जवळ घोंगडी सुकविण्यापुरते थांबून तिथेच जवळपास मुटकुळी करून रात्रीचे राज्य सुरू होता होता, अंथरूणावर पडल्या पडल्या झोपी जाणारा शेतकरी आता गणपतीच्याा दिवसात अख्खी रात्र जागरण करताना झोप घेतल्यापेक्षा अधिक ताजातवाना दिसायचा. गणपतीच्या आदल्यादिवशी बहुधा हरितालिका असायची.
सवाष्ण स्त्रिया आणि कुमारिकाही ते कडकडीत व्रत मोठया भक्तिभावाने अंगीकारण्यात धन्यता मानायची. त्यांचा उपवास ‘कडक’ असला तरी त्या व्रताशी आपला कसलाच संबंध नसल्यासारखे घरातले बापई गडी आणि इतर पोरे-सोरे त्यादिवशी तेवढयाच ‘भाविकतेने’ स्त्रियांनी उपाशीपोटी राहून, मोठया निगुतीने केलेल्या अन्नपदार्थाचा आस्वाद घेण्यात धन्यता मानायची. त्या रात्री बहुधा गणपतीच्या मूर्तीची स्थापना करण्याची जागा यथायोग्य अशी सजविली जायची.
हरणे, कांगले, तेरडा, कवंडळे, शेरवड इ. रानात मिळणा-या फुलाफळांनी गणपतीची ‘माटवी’ शोभायमान केली जायची. त्या काळच्या बहुतेक गणपतीचे आसन मालवणी मुलुखातील साधारणपणे प्रत्येक घरात आढळून येणा-या चोपाळयावरच आसावयाचे. गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरातील सगळी माणसे गणपतीच्या स्वागतासाठी अधिर झालेली असायची.
पोरासोरांचा उत्साह तर ओसंडून वाहायचा. इतर प्रदेशात दिवाळीच्या वेळी ऐकू येणारे फटाक्यांचे आवाज आमच्या भागात गणेश चतुर्थीच्या दिवसात ऐकू यायचे. घराघरातील मुलाबाळांचे फटाक्यांचे हट्ट सामान्यपणे पुरविले जायचे. ज्यांची फटाके विकत घेण्याची कुवत नसायची ती मुले मग बांबूच्या बारीक नळकांडयात तिरफळे घालून त्यांचे आवाज करून फटाके उडविण्याचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करावयाची.
गणपतीचे यथासांग पूजन व्हायचे, आरती व्हायच्या आणि गणपतीला तांदळाच्या उकडीच्या ‘मोदकांचा’ आणि ‘नेव्ह-यांचा’ नैवेद्य दाखवून झाला की, घरातील सारी माणसे त्यांवर मनसोक्त ताव मारायची. वर्षातून एकदा पुढयात आलेल्या हया पक्वानांचा आस्वाद मोठया अपूर्वाईने घेतला जायचा आणि त्याचे समाधान प्रत्येकाच्या चेह-यावर घर करून राहिल्यासारखे दिसून यायचे. गणपतीचा हा सण त्या काळात दीड दिवसांचा असायचा.
पण त्या दीड दिवसाच्या सोहळयासाठी सगळा मालवणी मुलुख किमान दीड महिना वाट पाहत राहायचा आणि हे सारे एका आंतरिक भक्तिभावातून आपसुकपणे घडायचे. गणपती विसर्जनाचा दिवस अवघ्या घरदाराला एक आगळी वेगळी हुरहूर घेऊन यावयाचा. विसर्जनासाठी तगडया पुरुष मंडळींनी गणपतीच्या पाटाला हात घातला की, घरच्या मालकीणीच्या डोळयांना पदर लागायचा.
लहान मुले जत्रेत चुकल्यासारख्या चेह-यांनी इकडे तिकडे भिरभिरत्या नजरेने पाहत राहायची. सारे घर उदास व्हायचे. आपणाला आधार देणार, आपले अरिष्ठ दूर करण्यासाठी प्रसंगी धावत येईल अशी खात्री वाटणारे आपले हे आराघ्यदैवत घराबाहेर आणले गेले की, अख्ख्या घरावर आभाळ दाटून यायचे आणि अशावेळी त्या गणपती बाप्पाला उद्देशून भरल्या गळयाने हाकारून ‘पुढच्या वर्षी लवकर या ऽऽ’ एवढेच ओले शब्द ओठातून बाहेर पडायचे.
आताच्या काळात गणपतीचा सण पूर्वीप्रमाणेच आमच्या मुलुखात मोठया उत्साहाने साजरा होतोच आहे. गणपतीचे स्वागत पूर्वीपेक्षा मोठया दिमाखाने केले जाते. गणपतीच्या मूर्तीतही खूप नावीन्य आणि वैविध्य असते. त्याची आरासही देखणी अशी केली जाते. आता काही अडचणींचे अपवाद वगळल्यास दीड दिवसांनी कोणीही गणपती विसर्जन करीत नाही. गणपती चांगले पाच, सात, अकरा, एकवीस दिवस आसनस्थ असतात.
सत्यनारायण होतो. भजन-पूजनांचा धुमधडाका असतो. सारे काही यथास्थित असते. फक्त कमतरता असते ती एकाच गोष्टीची. पूर्वी जसे गणरायाच्या सोबतीला सारे आबालवृद्ध असायचे, बागडत्या मुलांचा गणपतीभोवती गराडा असायचा, पोराबाळांच्या फुगडयांनी आणि मोठया उत्साहाने वाजत गाजत केलेल्या आरत्यांनी गणपती बाप्पा मोठया वैभवात आणि एका वेगळया तृप्तीच्या आनंदात स्थानापन्न झालेला दिसायचा. तसा प्रकार आता का कुणास ठाऊ क, सहसा दिसत नाही. विद्युत रोषणाईचा आणि वेगवेगळया सी.डी. कॅसेट्सचा डोक्याला झिणझिण्या आणणारा राबता असूनही बाप्पा बिचारा काहीसा अस्वस्थ झाल्यासारखा दिसतो.
रोजगाराच्या आणि पोटापाण्याच्या व्यवस्थेसाठी गाव सोडून दूर पुण्यामुंबईला गेलेली घरातील उमेदीची माणसे गणपतीच्या निमित्ताने सणाचा एखादा दिवस गणपतीच्या सेवेत आणि सान्निध्यात राहू शकतात आणि त्या विघ्नहर्त्यांच्या पूजाअर्चेची आणि विर्सजनाची व्यवस्था उतारवयाच्या म्हातारा- म्हातारीवर सोपवून गणपतीच्या विसर्जनापूर्वीच परतीच्या तिकिटांची व्यवस्था करून विसर्जित झालेली असतात. त्यामुळे आता घराघरात, केवळ घर जागे राहावे म्हणून पुण्यामुंबईला नकोशा झालेल्या म्हातारा-म्हातारीच्या सहवासातच बिचा-या गणरायाला विर्सजनापर्यंत आसनाला खिळून राहावे लागते, माणसांप्रमाणे देवांचेही दिवस बदलले हेच खरे!