उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर सफाई कर्मचा-यांच्या वेतनाची थकबाकी चुकती करण्याचा निर्णय नायब राज्यपाल नजीब जंग यांनी घेतला आहे.
नवी दिल्ली- दिल्ली उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर दिल्ली महानगर पालिकेच्या सफाई कर्मचा-यांच्या वेतनाची थकबाकी चुकती करण्याचा निर्णय दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी घेतला आहे. सफाई कर्मचा-यांच्या वेतनासाठी ४९३ कोटी रुपये मंजूर केल्याचे जंग यांनी सांगितले.
गरीब कर्मचा-यांचे वेतन रोखण्याचे कारण काय, विना वेतन या कर्मचा-यांनी काम का करावे, त्यांच्या आंदोलनामुळे सर्व दिल्लीकरांनाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या सफाई कर्मचा-यांचे वेतन १५ जूनच्या आत देण्यात यावे, असे न्यायालयाने शुक्रवारी सांगितले.
मागील तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे कर्मचा-यांनी दोन जूनपासून बेमुदत संप पुकारला होता.
शुक्रवारी सकाळी राहुल गांधी यांनी सफाई कर्मचा-यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला. तुमची जबाबदारी मी घेत आहे, गरज भासल्यास मी आंदोलनात सक्रीय सहभाग घेईन, असे आश्वासन देत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सफाई कर्मचा-यांना पाठींबा दिला. त्यांच्या भेटीनंतर काही वेळातच उच्च न्यायालयाने दिल्ली प्रशासनाला फटकारले आणि तातडीने नायब राज्यपालांनी निधी मंजूर केल्याची घोषणा केली.
खरेच याची कुणकुण राहुल गांधी यांना लागली होती का, असा प्रश्न आता केला जात आहे.
[EPSB]
राहुल गांधींचा सफाई कर्मचा-यांना पाठींबा »
वेतन थकबाकीच्या निषेधार्थ आंदोलन करणा-या दिल्ली महानगर पालिकेच्या सफाई कर्मचा-यांना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पाठींबा दिला.
[/EPSB]