वेतनाच्या मुद्यावरुन दिल्लीतील सफाई कामगारांनी पुकारलेला संप मागे घेतल्यानंतर दुस-याच दिवशी दिल्लीत स्वच्छता अभियानावरुन भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षामध्ये चढाओढ सुरु झाली आहे.
नवी दिल्ली – वेतनाच्या मुद्यावरुन दिल्लीतील सफाई कामगारांनी पुकारलेला संप मागे घेतल्यानंतर दुस-याच दिवशी दिल्लीत स्वच्छता अभियानावरुन भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षामध्ये चढाओढ सुरु झाली आहे. हातात झाडू घेऊन दोनही पक्षांचे नेते शनिवारी सकाळी रस्त्यांवर उतरले. यादरम्यान दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झाडण्यात आल्या.
शनिवारी सकाळी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आपचे नेते संजय सिंग, आशुतोष आणि अलका लांबा यांनी हातात झाडू घेत स्वच्छता अभियानात भाग घेतला. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली तेव्हा आम्ही सर्व त्याचा भाग होते. असे सिंग म्हणाले.
आप नेत्यांच्या सफाई अभियानानंतर दिल्लीतील भाजपाचे प्रमुख सतीष उपाध्याय यांनीही हातात झाडू घेत सफाई अभियानाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी केजरीवालांवर जोरदार टीकाही केली.
दरम्यान, दिल्लीत स्वच्छतेवरुन सुरु असलेल्या भाजपा आणि आपच्या राजकारणावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. असा प्रकार माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांच्यावेळी घडला नव्हता. आप आणि भाजपा दोन्ही यासाठी जबाबदार आहेत. काँग्रेसची सत्ता होती तेव्हा असे घडले नव्हते असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजय माकन म्हणाले.
गेल्या तीन महिन्यांपासून वेतन न दिल्याने दिल्लीतील सफाई कर्मचा-यांनी दोन जूनपासून बेमुदत संप पुकारला होता. त्यामुळे दिल्लीच्या रस्त्यांवर कच-याचे ढीग साचले होते. अखेर शुक्रवारी या कर्मचा-यांनी संप मागे घेतला.