राष्ट्रपती राजवटीखाली असलेल्या दिल्लीमध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु होण्याची चिन्हे आहेत.
नवी दिल्ली – राष्ट्रपती राजवटीखाली असलेल्या दिल्लीमध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु होण्याची चिन्हे आहेत.
दिल्लीचे नायाब राज्यपाल नजीब जंग यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे दिल्ली विधानसभेतील सर्वात मोठया पक्षाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण देण्याची परवानगी मागितली आहे. त्यामुळे भाजपकडून पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचा प्रयत्न होऊ शकतो. दिल्ली विधानसभेत ३२ आमदारांसह भाजप सर्वात मोठा पक्ष आहे.
नजीब जंग यांचे या संदर्भातील पत्र राष्ट्रपती भवनाला मिळाले असून, राष्ट्रपतींनी यावर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून त्यांचे मत मागितल्याची खात्रीलायक माहिती आहे. राष्ट्रपती भवनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नजीब जंग यांचा दिल्ली संदर्भातील अहवाल गुरुवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनाला मिळाला.
यावर केंद्रीय गृहमंत्रालयाचे मत जाणून घेण्यासाठी लगेचच हा अहवाल गृहमंत्रालयाला पाठवण्यात आला. विधानसभेमध्ये भाजपला एकदा बहुमत सिध्द करण्याची संधी दिली पाहिजे असे या अहवालात म्हटले आहे. दिल्लीमध्ये पुन्हा नव्याने विधानसभेच्या निवडणूका घेण्याची मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
मात्र पुन्हा निवडणूका नको असे भाजपमधील बहुतांश आमदारांचे मत आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालय राज्यपालांच्या मताशी सहमत असणारी भूमिका घेईल अशी शक्यता आहे. ६९ सदस्यांच्या दिल्ली विधानसभेमध्ये भाजप मोठा पक्ष असला तरी, भाजपकडे स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजपला फोडाफोडीचे राजकरणे करणे अनिवार्य आहे. अरविंद केजरीवाल यांनी फेब्रुवारीमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट आहे.