आम आदमी पार्टीने पाठिंबा देणा-या भाजप आणि काँग्रेससमोर काही जाचक अटी ठेवल्याने पुन्हा पेच निर्माण झाला आहे.
नवी दिल्ली –आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी सकाळी दिल्लीचे नायाब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेतल्यानंतर दिल्लीत सरकार स्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली होती.
मात्र आम आदमी पार्टीने पाठिंबा देणा-या भाजप आणि काँग्रेससमोर काही जाचक अटी ठेवल्याने पुन्हा पेच निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षांनी आपच्या मागण्या धुडकावून लावल्या आहेत.
दिल्लीत सरकार स्थापनेची शक्यता दिसत नसल्याने, राज्यपाल नजीब जंग यांनीही राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्याचे संकेत दिले आहेत. राज्यपालांच्या भेटीनंतर अरविंद केजरीवाल यांनी राज्यपालांकडून कुठलीही मुदत मागितली नसल्याचे स्पष्ट केले.
[poll id=”492″]
अरविंद केजरीवाल यांनी अठरा मुद्यांवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांची मते मागितली आहेत. यात दिल्लीतील व्हीआयपी संस्कृती संपवण्यासह आमदार निधी बंद करणे अशा १८ मागण्या आहेत. या मागण्यासंबंधी त्यांनी दोन्ही नेत्यांना लिहीलेली पत्रे केजरीवालांनी नजीब जंग यांना दिली. काँग्रेस आणि भाजप दोघेही ‘आप’ला सत्ता स्थापनेसाठी बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार आहेत. मात्र या मागण्या दोन्ही पक्षांनी फेटाळून लावल्या आहेत.
राज्यपालांच्या भेटीला गेलेल्या केजरीवालांबरोबर आपचे प्रवक्ते मनीष सिसोदीया आणि कुमार विश्वासही होते. दिल्लीच्या राज्यपालांनी दिल्लीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले होते पण पूर्ण बहुमत नसल्याने भाजपने सरकार स्थापन करण्यास नकार दिला. त्यामुळे राज्यपालांनी आपला निमंत्रित केले.
७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेत भाजपकडे ३१, आपकडे २८ आणि काँग्रेसकडे ८ जागा आहेत. बहुमतासाठी ३६ जागा आवश्यक असून, आपला सत्तास्थापनेसाठी आठ जागांची आवश्यकता आहे.
जबाबदारीपासून पळू नका
आम आदमी पक्षाने जबाबदारीपासून न पळता दिल्लीत सरकार स्थापन करून जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, अशी कानउघाडणी काँग्रेस पक्षाने शनिवारी केली. ‘आप’ या पक्षाची विचारसणी जनतेला अद्याप माहीत नाही. ते धर्मनिरपेक्ष आहेत, अशी आम्ही अपेक्षा करतो. त्यामुळे त्यांना बाहेरून पाठिंबा देण्यास आम्हाला वावगे वाटत नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते भक्त चरण दास यांनी सांगितले.