उत्तर प्रदेशातील दादरी येथे गोमांस शिजवल्याच्या संशयावरून गावक-यांनी केलेली मोहम्मद इकलाख यांची हत्या हा भाजपाचाच कट असल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे.
लखनऊ- उत्तर प्रदेशातील दादरी येथे गोमांस शिजवल्याच्या संशयावरून गावक-यांनी केलेली मोहम्मद इकलाख यांची हत्या हा भाजपाचाच कट असल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे. भाजपाने आपल्या राजकीय फायद्यासाठी हा सुनियोजित कट रचल्याचे समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशातील ज्येष्ठ नेते शिवपाल यादव यांनी म्हटले आहे. त्यामुळे या हत्याकांडाच्या मागे भाजपाचा हात आहे का? याविषयी तर्कवितर्काना उधाण आले आहे.
दादरी येथे अजूनही तणावाचे वातावरण आहे. तर ‘इकलाख यांचे कुटुंबीय अजूनही दु:ख आणि भीतीच्या सावटाखाली आहेत. मात्र तरीही आम्ही कुणालाही दादरी येथे जाण्यापासून अडवलेले नाही. कुणीही दादरी येथे जाऊ शकते. निदान त्यामुळे त्यांना सत्य तरी समजेल’, असे यावेळी यादव यांनी नमूद केले.
‘भाजपाने यापूर्वी मुजफ्फरनगर येथेही दंगली घडवल्या होत्या, आणि आता त्यांचा तसेच प्रकार इतर ठिकाणीही करण्याचा प्रयत्न आहे. मात्र आम्ही याबाबत राज्यभर पोलिसांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून पोलीस व स्थानिक प्रशासनाकडून यात दुर्लक्ष केले गेल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल’, असा इशाराही शिवपाल यादव यांनी यावेळी दिला.
शिवाय आगामी काळात असे प्रकार घडवण्याचा प्रयत्न केला गेला, तर त्याविरोधात कडक पाऊले उचलली जातील असे स्पष्ट करतानाच विरोधकांच्या टीकेचाही यादव यांनी चांगलाच समाचार घेतला. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडल्याची टीका विरोधक करत आहेत.
मात्र हे सारे राजकीय फायद्यासाठीच सुरू असल्याचे ते म्हणाले, तसेच कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली असती तर राज्यात सध्या वाढलेला गुंतवणूकदार आणी पर्यटकांचा आकडा कमी झाला असता, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या टीकेनंतर भाजपाने अद्याप यावर भाष्य केलेले नाही.
इकलाख यांच्या कुटुंबीयांना ४५ लाखांची मदत!
दरम्यान, यावेळी उत्तर प्रदेशातील सत्ताधारी असलेल्या समाजवादी पक्षाचे कुठलेही नेते अद्याप दादरी येथे का गेले नाहीत? असे विचारले असता आम्ही या मुद्दय़ाचे कुठलेही राजकारण करू इच्छित नाही, असे शिवपाल यादव म्हणाले. त्यामुळेच आमचे कुणीही नेते दादरी येथे गेलेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र आम्ही लखनऊ येथे इकलाख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असून त्यांना त्यांचे नवे घेर उभारण्यासाठी व सरकारी मदत म्हणून एकूण ४५ लाख रुपये सुपूर्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. या घटनेनंतर अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दादरी येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.