मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या संहारक साखळी बॉम्बस्फोटाचे सूत्रधार पाकिस्तानात सुखरूप आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी रोममध्ये इंटरपोलच्या आमसभेत स्पष्ट केले.
रोम- मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या संहारक साखळी बॉम्बस्फोटाचे सूत्रधार पाकिस्तानात सुखरूप आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी रोममध्ये इंटरपोलच्या आमसभेत स्पष्ट केले.
सबळ पुरावे देऊनही त्यांच्याविरोधात पाकिस्तानने कोणतीही कारवाई केलेली नाही, अशी टीका शिंदे यांनी केली. अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम हा या बॉम्बस्फोटांचा प्रमुख सूत्रधार होता. या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये २५७ जण ठार तर ७१३ जखमी झाले होते. तेव्हापासून दाऊद पाकिस्तानातच आहे.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, भारताला अजूनही मोठ्या प्रमाणात दहशतवादाचा, विशेषत: सीमेपलीकडील दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. दक्षिण आशियामध्ये डावपेचांचा भाग म्हणून दहशतवादाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे, याकडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. साध्या युक्त्या आणि साधारण दर्जाची हत्यारे वापरूनही दहशतवादी मोठ्या प्रमाणात विध्वंस घडवून आणू शकतात, हे त्यांनी २६/११च्या हल्ल्याचे उदाहरण देऊन सांगितले.
भारतात आतापर्यंत दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. दहशतवाद्यांनी आमच्या मनात भय निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने भारतीय समाजाने दहशतवादी कारवायांपुढे झुकण्यास वेळोवेळी नकार दिला आहे, असे सांगून शिंदे यांनी भारतापुढील आव्हानाची जाणीव करून दिली.
दहशतवादविरोधी लढ्यासाठी जागतिक सहकार्य हवे
कोणतेही खरे-खोटे कारण दहशतवादाचे समर्थन करण्यास पुरेसे नाही, असे स्पष्ट करून याविरोधात परिणामकारक लढा देण्यासाठी जागतिक सहकार्य हवे, अशी आग्रही मागणी शिंदे यांनी केली. जगभरात दहशतवादाशी संबंधित एकूण ६७० इंटरपोल नोटिसा प्रलंबित आहेत, त्यापैकी ५७७ रेड नोटिसा आहेत. एकट्या भारतातील फरारी दहशतवाद्यांविरोधात १३८ रेड नोटिसा प्रलंबित आहेत. हे सर्व दहशतवादी परदेशात आहेत.
दहशतवाद्यांची शेअर बाजारात गुंतवणूक
दहशतवादी कारवायांसाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज असते. आमच्या विश्वासार्ह गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी बनावट कंपन्यांमार्फत शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत, असे गृहमंत्री शिंदे यांनी आमसभेत सांगितले. अशा पैशांचे उगमस्थान शोधणे हे सर्वात महत्त्वाचे काम असून त्यासाठी इंटरपोलची भूमिका महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले.