बिहारमधील नववीच्या वर्गातील तीन विद्यार्थी दाऊद इब्राहिमला पकडण्यासाठी शनिवारी शाळेतून पळून गेले.
पटना – आयुष्यात भरपूर पैसै कमवावे आणि सुखवस्तू जीवन जगावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि हा पैसा मिळवण्यासाठी माणसे विविध क्लृप्त्या आजमावत असतात. अशीच अनोखी क्लृप्ती बिहारमधील विद्यार्थ्यांनी लढवली.
बिहारमधील नववीच्या वर्गातील तीन विद्यार्थी दाऊद इब्राहिमला पकडण्यासाठी शनिवारी शाळेतून पळून गेले. आपण दाऊद इब्राहिमला पकडून दिले तर आपल्याला भरपूर पैसै मिळतील असा त्यांचा विचार होता. तिघेही आधी पटना जिल्ह्यातून मोकामा येथे गेले. त्यानंतर तेथून कोलकाता शहरात जाऊन पोहोचले. कोलकातामध्ये गेल्यावर दाऊदला शोधायचे कुठे आणि कसे याचे कोडे त्यांना सुटले नाही आणि खर्चाचे सर्व पैसे संपल्यामुळे त्यांनी पुन्हा घरी परतण्याचे ठरवले.
ही तीनही मुले हरवल्याची तक्रार मुलांच्या पालकांनी दिघा पोलिस स्थानकात नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या शोधादरम्यान मुलांचे पळून जाण्याचे कारण समजले.