मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिम याच्या हस्तांतरासाठी भारत अमेरिकेची मदत मागण्याची शक्यता आहे.
वॉशिंग्टन– मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिम याच्या हस्तांतरासाठी भारत अमेरिकेची मदत मागण्याची शक्यता आहे. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, अल-कायदा आणि हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनांनी दाऊदला संरक्षण दिल्याने त्याला पकडण्यासाठी संयुक्त प्रयत्न गरजेचे आहेत.
भारत आणि अमेरिकेने मंगळवारी केलेल्या संयुक्त निवेदनात दहशतवाद्यांसाठी स्वर्ग असलेल्या भागात कारवाई करण्याबाबत प्रयत्न करण्याचे ठरले. दहशतवादी आणि गुन्हेगारांची आर्थिक मदत रोखण्याबाबत चर्चा करण्यात आली. दाऊद हा पाकिस्तानात राहत असावा, असा तपशील निवेदनात आहे. तर अफगाणिस्तानच्या सीमेवर हक्कानी नेटवर्क मोठयाप्रमाणावर कार्यरत आहे. ही दहशतवादी संघटना भारत आणि अमेरिकेच्या हितसंबंधांच्या विरोधात काम करते आहे. दाऊद हा दुबई व कराची दरम्यान प्रवास करत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे भारताने अमेरिकेकडे दाऊदच्या हस्तांतराबाबत मदत मागितली आहे.
भारताच्या परराष्ट्र खात्याच्या अधिका-यांनी दाऊदच्या हस्तांतराबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. मात्र, ‘समझदार व्यक्ती को इशारा काफी है’ अशा शब्दात परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी पत्रकारांना सांगितले.
भारत आणि अमेरिकेने दहशतवादविरोधी आणि सुरक्षेबाबत करार केला आहे. त्यात दोन्ही देशांनी गुप्त माहितीचे आदान प्रदान करण्यास मान्यता दिली आहे.