मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी स्फोटांनंतर मुंबईकरांना ख-या अर्थाने दहशतवादाची दाहकता कळली. या स्फोटांतील शस्त्रे आणि स्फोटकांचा साठा सागरी मार्गानेच देशात आणण्यात आला होता.
मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी स्फोटांनंतर मुंबईकरांना ख-या अर्थाने दहशतवादाची दाहकता कळली. या स्फोटांतील शस्त्रे आणि स्फोटकांचा साठा सागरी मार्गानेच देशात आणण्यात आला होता. त्यानंतर २६ नोव्हेंबर २००८ला झालेल्या दहशवादी हल्ल्यात मुंबई पुन्हा एकदा पोळून निघाली. त्यावेळीही दहशतवाद्यांनी मुंबईत शिरण्यासाठी सागरी मार्गाचाच वापर केला.
त्यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती झाली. ९३च्या साखळी स्फोटाला आता २० वर्षे उलटून गेली आहेत. तरीही स्थितीत काही बदल झालेला नाही. पाकिस्तानातून येणारी शस्त्रे व मूठभर दहशतवाद्यांनी सागरी सुरक्षेतील त्रुटी नेहमीच दाखवून दिल्या आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांच्या कारवायांनी झाकोळलेला समुद्र, भक्कम सुरक्षा यंत्रणेच्या प्रकाशात वेळीच उजळला नाही, तर देशाच्या सागरी किना-यांना दहशतवादाच्या लाटा अशाच धडकत राहतील.
मुंबईत २६/११ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या नावाखाली अनेक उपाययोजना करण्यात आल्या. सागरातील हालचाली टिपण्यासाठी केंद्र सरकारकडून रडारही बसवण्यात आले. तटरक्षक दल, नौदल, सागरी पोलिसांची गस्त यात वाढ झाली. पण मुंबई, कोकण, गोवा व गुजरातचा किनारा खरोखर सुरक्षित आहे का, हा प्रश्न अद्याप कायम आहे.
९३च्या साखळी स्फोटांत श्रीवर्धनच्या शेखाडी बंदरावर २२ पोती शस्त्रे आणि स्फोटके उतरवण्यात आली होती. पण सागरी मार्गाचा वापर करून शस्त्रांचा साठा उतरवण्यात आल्याची ही पहिलीच घटना नव्हती. या घटनेच्या काही महिन्यांपूर्वीच १९९२मध्ये अहमदाबादमध्ये एके-५६ रायफल्स, सहा हजार काडतुसे, दोन पिस्तूल, चार ट्रान्समीटर बॉम्ब, एक लाइट मशिनगन, आठ रॉकेट लाँचर व १० हातबॉम्ब सापडले होते. त्यावेळीच योग्य ती उपाययोजना केली असती, तर ९३चे साखळी स्फोट घडले नसते.
त्यानंतरही परिस्थिती बदलली नाही. सागरी मार्गानी शस्त्रांच्या तस्करीला म्हणावा तसा चाप बसला नाही. त्यामुळेच ९३च्या साखळी स्फोटांनंतरही १९९५मध्ये कच्छ बंदरातील सिरक्रीक भागातून सहा एके-५६ रायफल्स, दारूगोळा व २० किलो चरस हस्तगत करण्यात आले. १९९६ मध्ये विदेशी रायफल्स, रिव्हॉल्वर, ४४ बोअरच्या वेम्बली रायफल्स, अमेरिकन बनावटीची रिव्हॉल्वर व ब्राउन शुगर असा सहा कोटी रुपयांचा माल पकडण्यात आला होता.
तोही समुद्रामार्गेच देशात दाखल झाला होता. त्यानंतर १९९७ साली मेहसाणातून चार किलो आरडीएक्स तसेच कच्छजवळील कोटेश्वरच्या खाडीतून पाच एके-४७, सहा स्निपर गन, १९ पिस्तुले व पाच रिव्हॉल्वर जप्त करण्यात आल्या. पुढे २००२मध्ये कच्छच्या संथाणा गावात २० किलो आरडीएक्स, एके-५६, रॉकेल लाँचरचा साठा सापडला होता.
सागरी सुरक्षेसाठी आपल्याकडे त्रिस्तरीय व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. त्यात स्थानिक पोलिस, तटरक्षक दल व नौदलाला त्यांच्या सागरी सीमा ठरवून देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. समुद्रातील संशयास्पद हालचालींची माहिती मिळवण्यासाठी मच्छीमारांना अद्याप विश्वासात घेतले जात नाही. त्यासाठी नौदलाच्या वतीने प्रयत्न करण्यात आले होते. त्यासाठी मुंबईतील कोळीवाडयांमध्ये बैठकाही घेण्यात आल्या. पण पुढे त्याचा पाठपुरावा न केल्यामुळे समुद्रात खब-यांचे जाळे पसरवण्याचा नौदलाचा प्रयत्न कागदावरच राहिला.
आंतरराष्ट्रीय बंदर असलेल्या मुंबईसाठी पोलिसांचा वेगळा पोर्ट झोन आहे. या विभागाला १६ बोटी देण्यात आल्या होत्या. पण त्यातील अर्ध्याहून अधिक बिघडल्या आहेत. बुचर आयलँडवर आपल्या तेल कंपन्यांचे मोठे भांडार आहे, बॉम्बे हायमध्ये तेलविहिरी आहेत, नवी मुंबईत सेझ उभा राहत आहे. कोकणात किनारी भागात महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभे राहत आहेत, या सर्वाच्या सुरक्षेचे काय, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.