पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानकडून दहशतवादाविरुध्द ठोस कारवाई होणे आवश्यक आहे असे मत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले
पंतप्रधानांच्या विशेष विमानातून – पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानकडून दहशतवादाविरुध्द ठोस कारवाई होणे आवश्यक आहे असे मत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले. इराण येथील नाम शिखर परिषद आटोपून मायदेशी निघालेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारत-पाकिस्तान संबंधांवर विस्तृत भाष्य केले.
मी पाकिस्तान दौ-यावर जाण्याचा गांर्भीयाने विचार करत आहे. पण त्यासाठी दोन्ही देशांकडून आश्वासक, विश्वासार्ह वातावरण तयार झाले पाहिजे. पाकिस्तानने त्यांच्या भूमीवरुन भारता विरुध्द चालणा-या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी ठोस पाऊल उचलावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुंबई 26/11 हल्लेखोरांवर पाकिस्तानकडून कठोर कारवाई होईल त्याचवेळी दोन्ही देशांमध्ये विश्वासार्ह वातावरण तयार होईल असे सिंग म्हणाले.
तेहरान येथे संपन्न झालेल्या 16 व्या शिखर परिषदेच्यावेळी मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असीफ अली झरदारी यांची भेट घेतली. त्यावेळी झरदारींनी सिंग यांना पून्हा पाकिस्तान भेटीचे निमंत्रण दिले. 26/11 हल्लेखोरांवर कारवाई पाकिस्तानसाठी एक परिक्षा असल्याचे सिंग यांनी सांगितले. पाकिस्तानी भूमीवरुन भारत विरोधी कारवायांना थारा मिळू नये ही भारताची प्रामाणिक भावना आहे. पाकिस्तानने त्यावर अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.