देशातील पायाभूत क्षेत्रातील उलाढाल दशकभराच्या कालावधीत ६.६ लाख कोटी रुपयांवर जाईल.
मुंबई- देशातील पायाभूत क्षेत्रातील उलाढाल दशकभराच्या कालावधीत ६.६ लाख कोटी रुपयांवर जाईल. आशिया-प्रशांतमधील एकूण बाजाराच्या तुलनेत हे प्रमाण १२.५ टक्के एवढे असेल. गृहउभारणी, दूरसंपर्क, आरोग्यसेवा, शैक्षणिक, वाहतूक यांसारख्या क्षेत्रांचे पायाभूत बाजाराच्या वाढीला हातभार लागेल, असे एका अहवालात म्हटले आहे.
सल्लागार कंपनी असलेल्या पीडब्ल्यूसीनुसार, आशिया-प्रशांत क्षेत्रातील पायाभूत क्षेत्रातील उलाढाल प्रति वर्ष ७-८ टक्क्यांनी वाढून २०२५पर्यंत हा बाजार ५३.६ लाख कोटी रुपयांचा आकडा गाठेल. जागतिक पायाभूत बाजारात आशिया-प्रशांत ६० टक्क्यांचा हिस्सा राखेल, असे आपल्या अहवालात म्हटले आहे. आशिया-प्रशांतमधील भारतीय पायाभूत क्षेत्रातील उलाढालही वाढणार असून ती २०२५ पर्यंत ६.६ लाख कोटींवर जाईल. जे आशिया-प्रशांतच्या एकूण उलाढालीच्या १२.५ टक्के एवढे प्रमाण असेल, असे यात नमूद करण्यात आले आहे.
वाहतूक आणि सेवा क्षेत्रातील गुंतवणूक या कालावधीत तिपटीने वाढणार आहे. शहरी भागात वाढणा-या लोकसंख्येबरोबरच उत्पन्न आणि प्रवासाची वाढती मागणीचा याला मोठा हातभार लागेल, अशी शक्यता अहवालात वर्तवण्यात आली आहे. तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील सध्याच्या घडामोडी आणि त्याला वाढती मागणी पाहता दूरसंपर्क क्षेत्रातील गुंतवणूकही वाढणार आहे. त्याचबरोबर इतर देशांच्या तुलनेत वाढती लोकसंख्या पाहता पायाभूत सुविधांची मागणी वाढणे अपेक्षित असल्याचे हा अहवाल सांगतो.
आरोग्य सेवा क्षेत्रातील वार्षिक गुंतवणुकीच्या दराने २०२५पर्यंत ही गुंतवणूक ३७ अब्ज डॉलरवर, तर शैक्षणिक पायाभूत सुविधांवरील खर्च १८.९ टक्क्यांवर जाण्याचा अंदाजही यात वर्तवण्यात आला आहे. आशियाची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, व्यापारातील स्पर्धा आणि त्या तुलनेत पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे या क्षेत्रातील पायाभूत क्षेत्राच्या विकाला मोठा वाव असल्याचे यामध्ये म्हटले आहे.
चीन, इंडिया आणि आग्नेय आशियातील मोठी बाजारपेठ तसेच स्वस्त मनुष्यबळाबरोबरच मोठया प्रमाणावरील नैसर्गिक स्त्रोत यामुळे आशिया हे आता जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासाचे इंजिन बनले आहे. – मनीष अग्रवाल, प्रमुख (पायाभूत सुविधा), पीडब्ल्यूसी इंडिया