मुंबई – मागील काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत शनिवारपासून दमदार हजेरी लावली. तलावक्षेत्रांतही चांगली पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे जलपातळीत वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागला आहे. सकाळी ६.३२ च्या सुमारास मोडक सागर वाहू लागला. मागील वर्षी १ ऑगस्टला हा तलाव भरून वाहू लागला होता. अन्य पाणलोट क्षेत्रांतही चांगला पाऊस झाल्यामुळे या तलावांतील पाण्याची पातळीही समाधानकारक आहे. सातही तलावांत आतापर्यंत ८ लाख ९९ हजार ३८८ लक्ष लिटर्स पाणीसाठा जमा झाला आहे.
त्यामुळे यंदा मुंबईकरांना पाण्याची समस्या भेडसावणार नाही, असे चित्र आहे. सकाळी ८.०० ते दुपारी २.३० पर्यंत कुलाबा येथे ४.८ मिमी पावसाची नोंद झाली. तर सांताक्रुझ येथे ५५.१ मिमी पावसाची नोंद झाली, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली. पुढील २४ तासांत ढगांच्या गडगडाटासह पावासाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. शहर आणि उपनगरांत शनिवारपासून पावसाच्या जोरदार सरी बरसल्यामुळे उकाडय़ापासून मुंबईकरांची सुटका झाली आहे.
महापालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रांवर नोंदविण्यात आलेल्या सरासरीनुसार सकाळी ८.०० ते दुपारी ३.०० पर्यंत शहरात १५.५२ मिमी तर पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांत अनुक्रमे ४६.७६ आणि ३०.०८ मिमी पावसाची नोंद झाली. पश्चिम उपनगरात एका ठिकाणी भिंतीचा काही भाग कोसळला तर शहर आणि उपनगरांत तीन ठिकाणी तीन शॉर्टसर्किटच्या घटना घडल्याचे महापालिकेने सांगितले.
माळशेज घाट बंद, भुशी धरणावर पर्यटकांना बंदी
नगर राष्ट्रीय महामार्गाचा प्रमुख भाग असलेल्या माळशेज घाटातील वाहतूक शुक्रवारी मध्यरात्रीपासून अचानक बंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे या घाटात दरड कोसळण्याची भीती असल्याचा तांत्रिक अहवाल राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे देण्यात आला. त्यानंतर हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या घाटातील वाहतूक बंद करण्यात आल्याने प्रवाशांना कल्याण – बदलापूर – कर्जत – चौक फाटा- खोपोली हायवे आणि कल्याण – नेवाळी- तळोजा बायपास – पुणे लिंक रोड या मार्गाने प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी धरणाच्या पाय-यांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. गेल्या ४८ तासांच्या पावसाने पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लोणावळा पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.