अयोध्येत पाडलेली बाबरी मशीद, गुजरातमध्ये झालेली दंगल व उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर दंगलीचा बदला घेऊ, अशी धमकी जगात नृशंस कृत्य करणारी ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने दिली.
नवी दिल्ली- अयोध्येत पाडलेली बाबरी मशीद, गुजरातमध्ये झालेली दंगल व उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर दंगलीचा बदला घेऊ, अशी धमकी जगात नृशंस कृत्य करणारी ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने शनिवारी दिली. याबाबतचा व्हीडिओ ‘इसिस’ने प्रसारित केला असून त्यात कल्याणचा फहाद शेख हा दहशतवादी दिसत आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ माजली आहे.
‘आम्ही परत येऊ, मात्र आमच्या हातात तलवार असेल. आम्ही तुमचा गळा चिरू. अयोध्येत पाडलेली बाबरी मशीद, मुजफ्फरनगर, गुजरात, काश्मीरमध्ये मुस्लिमांच्या होणा-या हत्या यांचा बदला घेतला जाईल, अशी धमकी दहशतवादी फहाद शेख याने व्हीडिओद्वारे दिली. भारतात मुस्लीम सुरक्षित नाहीत. त्यांच्या स्वातंत्र्यावर नवनवीन नियम टाकून गदा आणली जात आहे. आमचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे, अशी मुक्ताफळे त्याने उधळली.
बाटला हाऊस चकमकीनंतर आमचे जीवन अत्यंत कठीण बनले. एटीएस, पोलीस, तपास यंत्रणा आमच्या मागे लागल्या आहेत. आम्ही काही जण भारतातून पळालो. त्यानंतर मुजाहिदीनांसोबत खोरासन भागात पोहोचलो, असे फहाद शेखने सांगितले. मे २०१४ मध्ये कल्याणचे अरीफ माजीद, फहद शेख, अमान तांडेल व साहीम टांकी हे मे २०१४ मध्ये ‘इसिस’मध्ये जाण्यासाठी इराकला पळाले. त्यापैकी अरिफ मजिद हा सीरियाहून भारतात परतला असून तो सध्या एनआयएच्या ताब्यात आहे. तर शाहीम टाकी हा रक्का येथील हल्ल्यात मारला गेला. आम्ही या सर्वाचा बदला घेऊ, अशी धमकी त्यांनी दिली.
मुस्लिमांवर होणा-या अन्यायाचा बदला घेतला जाईल. तुम्ही मुंबई रेल्वेतील साखळी बॉम्बस्फोट, गुजरात व दिल्लीतील हिंसक कृत्ये विसरलात का? आम्ही प्रत्येक अन्यायाचा बदला घेणारच, असे त्याने सांगितले. भारत, पाकिस्तान व अफगाणिस्तानातील मुस्लिमांनी ‘इसिस’च्या दहशतवादी कृत्यात सहभागी व्हावे. आमच्या मुस्लीम महिलाही भारतात सुरक्षित नाहीत.
गायीच्या नावाखाली आणि अन्य कारणांनी मुस्लिमांना ठार केले जात आहे. ते आम्हाला हिंदू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे शेख म्हणाला.इसिसच्या व्हीडिओत दिसणारे अनेक जण पूर्वी इंडियन मुजाहिदीनमध्ये काम करत होते.
गायी पूजा करणारे हिंदू हे मुस्लीमविरोधी हिंसाचाराला कारणीभूत आहेत. त्यांनी मुंबई, गुजरात, आसाम, मोरादाबाद येथे हिंसाचार घडवला होता, असा आरोप त्याने केला. हे हिंदू काफीर गाय, सूर्य व चंद्राची पूजा करतात. मात्र, ते अल्लाला मानणा-यांचा द्वेष करतात, असे त्याने सांगितले.
कल्याणचा फहाद शेख सामील
कल्याण- ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने शुक्रवारी नवीन व्हीडिओ प्रसारित केला आहे. यात कल्याणहून इसिसमध्ये सामील होण्यासाठी गेलेल्या चार तरुणांपैकी दोन तरुण दिसत आहेत.
फहाद शेख आणि अमन तांडेल अशी या दोघांची नावे असून यापैकी अमन तांडेलने या व्हीडिओमध्ये भारतविरोधी वक्तव्ये केल्याचे दिसत आहे. १ मे २०१४ रोजी कल्याणच्या बैलबाजार परिसरात राहणारे आरिफ माजिद, फहाद शेख, सहीम तानकी आणि अमन तांडेल हे चार तरुण सीरियात जाऊन ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचे उघड झाले होते.
तर राष्ट्रीय तपास यंत्रणेचीही यानंतर या चौघांच्या हालचालींवर करडी नजर होती. यानंतर आरिफ माजिद हा एका हल्ल्यात मारला गेल्याचे वृत्त आले होते. मात्र तो एका हल्ल्यात जखमी झाल्याने इसिसने त्याला तिथेच सोडून दिले होते. यानंतर आरिफने तुर्कस्थान गाठून आपल्या वडिलांशी संपर्क साधला आणि तो भारतात परतला होता.
सध्या तो राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात आहे. तर जानेवारी २०१५ मध्ये या चौघांपैकी सहीम तानकीचा एकाआत्मघाती हल्ल्यात मृत्यू झाल्याची बातमी आली होती. त्यानंतर सहा महिन्यांनी उर्वरित दोन तरुणांपैकी एकाने कुटंबीयांना एसएमएस पाठवत आपण सुखरुप असल्याचे कळवले होते. मात्र त्यानंतर त्यांच्याशी कुठलाही संपर्क झालेला नाही.