हिंदवी स्वराज्याची कीर्तीध्वजा अवघ्या भारतभर पसरवणा-या आणि युगप्रवर्तक छ. शिवरायांचा वारसा ख-या अर्थाने चालवणा-या थोरल्या बाजीरावांचा आज स्मृतिदिन.
बाळाजी विश्वनाथांचा हा थोरला पुत्र. आपल्या सर्व सरदारांमध्ये मराठा साम्राज्याची आकांक्षा निर्माण करून ती सिद्धीस नेणारा आणि चहुदिशांना मराठी सत्तेच्या नौबती वाजवणा-या या प्रतापी बाजीरावाने स्वकर्तृत्वावर दिल्लीच्या राजकारणात प्रवेश केला.
दाभाडे, निजाम व दिल्लीकरांशी झालेल्या लढाया, पालखेडची लढाई, डभई व भोपाळची रणयुद्धे, बुंदेलखंड व औरंगाबादचा रणसंग्राम ही थोरल्या बाजीरावांच्या पराक्रमाची ठळक स्थाने. चिमाजी आप्पांसारखा पराक्रमी व मुत्सद्दी भाऊ, होळकर, शिंदे, पवारांसारखे पराक्रमी सरदार यांच्या बळावर बाजीरावांनी मराठा साम्राज्याचा लौकिक वाढवला.
‘मर्द त्या मराठी फौजा। रणकीर्ती जयांच्या गाव्या। तळहाती शिर घेवूनिया, चालूनी तटावर जाव्या। जणू घोंघावत मधमाशा, झणी मोहळास बिलगाव्या।’ अशी वृत्ती मराठी फौजांत निर्माण करणारा हा प्रतापी बाजीराव. दि. २८ एप्रिल १७४० रोजी त्यांचे निधन झाले.