ऑफिसच्या आणि घरच्या जबाबदा-या पूर्ण करताना महिलांची अक्षरश: दमछाक होते. कामाचा ताण सहन करून परत घरच्यांच्या जिभेचे चोचले पुरवायचे म्हणजे सगळा वेळ त्यातच निघून जातो. म्हणूनच एखाद् दिवशी वेळ काढून थोडीशी पूर्वतयारी करून ठेवली तर तुमची ही कसरत काहीशी कमी होईल. आणि तुमचा वेळही वाचेल. पण स्वयंपाकघरातली पूर्वतयारी म्हणजे काय याच्या काही टिप्स खास महिलांसाठी..
आजकाल महागाई इतकी वाढली आहे की दोघांपैकी एकाने घरी बसणं शक्य नाही. त्यामुळे संसाराचा रथ ओढण्यासाठी दोन्ही चाकं फिरावी लागतात. त्यात ऑफिस आणि घर अशी महिलांची तारेवरची कसरत होत असते. त्यात ऑफिसमध्ये बॉसची कटकट, टार्गेट पूर्ण करण्याचं डेडलाईनचं दडपण, मुलांचं टेन्शन, त्यात घरची आवराआवर, जेवण करणं.. वगैरे वगैरे. हे सगळं सांभाळायचं म्हणजे तारेवरची कसरतच असते.
असं म्हणतात की तृप्तीचा मार्ग हा पोटातून जातो. म्हणजे घरातल्या मंडळींना घरच्या महिलांच्या हातचंच जेवण लागतं. म्हणून कित्येक नोकरी करणा-या महिला घरातच जेवण बनवतात. जेवण बनवणं नुसतं फोडणीला घातलं म्हणजे झालं नाही. तर आधी कितीतरी गोष्टींची तयारी करावी लागते. मुळात आज जेवायला किंवा न्याहारीला काय करायचं हा यक्षप्रश्न महिलांना सतावत असतो. ते ठरल्यावर त्याची तयारी करावी लागते.
त्यामुळे तिचा बरासचा वेळ हा किचनमध्येच जातो. कारण सकाळची न्याहारी, दुपार मुलांचे आणि आपल्या जेवणाचे डबे, मुलांना घरी आल्यावर काय द्यायचं आणि त्यानंतर रात्रीचं जेवण.. या सगळ्यात तिचा जीव मेटाकुटीला येतो. म्हणूनच नोकरी करणा-या महिलांनी एखाद् दिवशी वेळ काढून काही पूर्वतयारी करून ठेवली तर जेवण पटकन होईल, तिचा वेळ वाचेल आणि तिला तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळेल. पण पूर्वतयारी म्हणजे नेमकं काय करायचं याच्या काही टिप्स बघू या.
फ्रीजचं प्लानिंग कसा कराल?
एक दिवस वेळ काढून तुमचा फ्रीजचं प्लानिंग करा. फ्रीजचं प्लानिंग करणं म्हणजे नेमकं काय असं तुम्हाला वाटत असेल. तेच जाणून घेऊयात. अशा कित्येक वस्तू असतात की त्या फ्रीजमध्ये दीर्घकाळ टिकतात. जेणेकरून तुमचे एक-दोन आठवडे आरामात जाऊ शकतात.
आपण नेहमी तुरीच्या डाळीचं वरण करतो. कधी कधी बदल म्हणून त्यात मूग डाळ, मसूर डाळ अशा डाळीही वापरतो. मग एक दिवस आपल्याला आठवडयाला लागणा-या डाळींचा अंदाज घेऊन त्या शिजवून हवाबंद डब्यात ठेवाव्यात. जेव्हा लागेल तेव्हा त्या फोडणीत घालता येतात.
कित्येक जण जेवणात आलं-मिरची-लसूण आणि कांद्याचा वापर करतात. मग आलं-मिरची-लसूण किंवा आलं-लसूण आणि कांद्याची अशी वेगवेगळी पेस्ट करून छोटया छोटया डब्यांमध्ये भरून ठेवावी. फोडणीच्या वेळी पटकन घालता येतात. अगदी तुम्ही बर्फ वापरत नसाल तर बर्फाच्या ट्रेमध्ये देखील तुम्ही हे साठवून ठेवू शकता. आणि लागेल तेव्हा तेवढा एक छोटा तुकडा वापरता येईल. मात्र अशामुळे तुमच्या फ्रीजला वास येण्याची शक्यता असते. म्हणून वेगवेगळे डबे किंवा काचेच्या छोटया बरण्यांमध्ये या वेगवेगळ्या पेस्ट करून ठेवाव्यात.
एकाच आकाराच्या बरण्या किंवा डबे वापरले तर तुमचा फ्रीजही चांगला दिसेल. खरं म्हणजे या पेस्ट बाहेर सुपर मार्केटमध्येही मिळतात. मात्र त्यावर भरवसा करण्यापेक्षा आपण आपल्या फ्रीजवर भरवसा ठेवू शकतो. कारण त्या किती जुन्या आहेत तसंच त्या वापरल्यामुळे आपल्या आरोग्याला धोका निर्माण होईल का, हे आपण सांगू शकत नाही. या पेस्ट आपणच तयार करत असल्याने त्या स्वच्छ आणि व्यवस्थित कशा राहतील याकडे लक्ष ठेवता येईल. तुम्हाला पेस्ट नको असेल तर लसूण पाकळ्यांची सालं काढून ती एका डब्यात भरून ठेवावीत. म्हणजे हवा तेव्हा पटकन लसून वापरता येतो.
कित्येकांच्या घरात वाटणाच्या भाज्या असतात. वाटण करायचं म्हणजे अर्धा-पाऊण तासांची निश्चिंती. मग आठवडयाभराचं वाटणही तुम्ही करून ठेवू शकता. फ्रीजच्या चीलरमध्ये ते व्यवस्थित राहू शकतं.
आठवडयाच्या भाज्या आणून फ्रीजमध्ये ठेवणं अधिक सोयीस्कर ठरू शकतं. अगदी बटाटे, बीट अशा गोष्टी उकडून ठेवाव्यात. शक्य झाल्यास सलाडही करून ठेवलं तरीही चालतं. म्हणजे कोबी, कांदा, बीट आणि गाजर यांच्या लांब चकत्या किंवा हे किसून डब्यात भरून ठेवावं. हवं तेव्हा मीठ आणि लिंबू पिळून घेता येतं. आजकालच्या इन्स्टंटच्या जमान्यात चपात्याही तुम्हाला रेडिमेड मिळतात.
त्या आणून फ्रीजमध्ये ठेवाव्यात आणि हव्या तेव्हा गरम गरम भाजून घ्याव्यात. आजकाल मुलांच्या डब्यासाठीही हटके ठरेल असे फ्रोजन पदार्थ मिळतात. ते आणून पटकन तेलात तळले की तुमच्या मुलांच्या डब्याचा प्रश्न सुटलाच म्हणून समजा.
स्वयंपाकघराचं प्लानिंग
वर म्हटल्याप्रमाणे या इन्स्टंटच्या जमान्यात कित्येक गोष्टी आपल्याला हातासरशी मिळतात. आजकाल चायनीज किंवा पिझ्झा खाण्याचं वेड मुलांना अधिक आहे. अशा वेळी बाजारात कित्येक सॉस किंवा चटण्या रेडिमेड मिळतात. पिझ्झा सॉस, टोमॅटो सॉस आणूण ठेवावा.
कधी भाजी करायचा किंवा खायचा कंटाळा आला तर तोंडी लावायला चटण्या, सॉस किंवा लोणची बरी पडतात. बाजारात मिळणारं हे सगळं सामान आणून किचनमध्ये भरून ठेवावं. आयत्या वेळी बरं पडतं. तसंच भरलेल्या किंवा तळलेल्या मिरच्यादेखील मिळतात. त्यादेखील आणून ठेवाव्यात.
स्वयंपाक करताना कित्येकदा आपण कोरडया पावडरी वापरतो. म्हणजे धणा-जिरं पावडर, मिरची पावडर, गरम मसाला पावडर. ड्राईड मशरूम, भाजलेला कांदा किंवा सुकं खोबरं, आलं-लसूण पावडर, कॉर्नफ्लॉवर पावडर अशा विविध प्रकारच्या पावडरी तुम्ही आणून ठेवू शकतात. मसाल्यांचंदेखील असंच असतं. पावभाजी, छोले, सांबार, मिक्स भाजी, गरम मसाला, पाणीपुरी मसाला, चाट मसाला असे मसालेदेखील भरून ठेवू शकतात.
हे सगळं आणताना आपल्याकडे ते किती दिवसांत संपेल आणि त्याची एक्स्पायरी डेट पाहूनच याचा अंदाज घ्या. म्हणजे ते फुकट जाणार नाहीत.
मेन्यू ठरवा
हाताची पाचही बोटं सारखी नसतात त्याप्रमाणे घरातल्या माणसांच्या आवडीनिवडीही सारख्या नसतात. प्रत्येकाची आवड-निवड वेगळी असते. आणि हॉटेलिंग पण आपल्याला आवडत नाही. कारण ते आपल्या परिवाराच्या दृष्टीने हानिकारक असतं.
त्यात आपल्याला प्रत्येकाच्या मर्जीतलं व्हायचं असतं म्हणून मग आपण प्रत्येकाची आवड जोपासण्याचा प्रयत्न करतो. त्यात कधी एक किंवा दोन भाज्या किंवा कोशिंबीर केल्या जातात. पण हे सगळं उरलं तरीही आपल्याला चालत नाही. रात्रीच्या जेवणाच्या वेळी आपलं संपूर्ण कुटुंब एकत्र असतं. मग त्यांच्यासाठी जेवण करण्यासाठी काय केलं पाहिजे हे पाहू या.
सगळ्यात प्रथम रात्रीचं जेवण करताना तुम्ही शांत राहिलं पाहिजे. जेवण बनवा जे प्रथिनं, जीवनसत्त्व, फायबर यांनी युक्त आणि चवीला मस्त असेल.
तुम्ही कोणता वेगळा पदार्थ केला असेल तर त्या पदार्थाला एक छानसं वेगळं नाव द्या. म्हणजे बघा त्याचा कसा परिणाम होतो ते. कारण त्यांचं चांगलं इम्प्रेशन पडतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या पदार्थाच्या चवीवर लक्ष केंद्रित करा.
नेहमीच्या त्याच त्याच कोशिंबिरी किंवा सलाडपेक्षा काहीतरी वेगळी चव देण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे कधी कधी उकडलेले बटाटे जे तुमच्या फ्रीजम्ये आहेत ते कुस्करा, त्यात कांदा, गाजर असं क्रंची सलाड, चीझ, कॉर्न असं काही घाला. दही आवडत असेल तर त्यावर घाला. वरून मिरपूड किंवा चाट मसाला घाला. म्हणजे जरा वेगळी चव येईल. काहीसा कॉन्टिनेन्टल फूड केल्याचा आनंद मिळेल.
पदार्थ सजवण्यासाठी
आपण जेवण बनवल्यावर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे केलेला पदार्थ सजवणे, म्हणजे त्यावर कधी कोथिंबीर घालून तर कधी टोमॅटोची किंवा रंगीत सिमला मिरचीचे तुकडे घातले जातात. किंवा घालावेत. म्हणजे तुमच्या पदार्थाला एक वेगळाच लूक मिळेल.
यासाठी कोथिंबीर निवडून आणि मिरच्यांची देठ काढून कागदात किंवा कपडयात गुंडाळून एका हवाबंद डब्यात तुम्ही त्या ठेवल्यात तर त्या चांगल्या टिकतात. तसंच वर सांगितल्याप्रमाणे काही सलाडचे कापही करून ठेवावेत. म्हणजे आयत्या वेळी बरं पडतं. तो पदार्थ अधिक चांगला दिसेल. तो सजवलेला पदार्थ पाहून कधी एकदा आपण खातोय असं होईल. अशा काही गोष्टींचं पालन केलं तर तर तुमचा वेळ वाचेल आणि तुम्हाला कुटुंबासमोवेत वेळ घालवता येईल.