भाजपसह तेलंगण विरोधक समर्थकांनी प्रचंड गोंधळ केल्याने राज्यसभेचे कामकाज गुरुवारपर्यंत स्थगित करण्यात आले.
नवी दिल्ली- तेलंगण विधेयकावर चर्चा करण्यासाठी आधी राज्यसभेच्या कामकाजाचे थेट प्रसारण सुरु करण्याची मागणी भाजपने केली आहे. विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज सुरुवातीला दुपारी बारावाजेपर्यंत त्यानंतर पुन्हा तीन वाजेपर्यंत आणि त्यानंतर चार वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. मात्र त्यानंतरही विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने आता हे विधेयक गुरुवारी सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारने बुधवारी तेलंगण विधेयक राज्य सभेत सादर करण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपसह तेलंगण विरोधक समर्थकांनी प्रचंड गोंधळ केल्याने राज्यसभेचे कामकाज गुरुवारपर्यंत स्थगित करण्यात आले.
त्याआधी थेट प्रसारण सुरु होणे आवश्यक आहे, अन्यथा आम्ही चर्चा होऊ देणार नाही, असे भाजपचे राज्यसभेतील उपनेते रवी शंकर प्रसाद यांनी सांगितले. विरोधकांनी प्रचंड गोंधळ केल्याने राज्य सभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
तेलंगण विधेयकाच्या मंजुरीच्या वेळी लोकसभेत गदारोळ सुरू असताना या कामकाजाचे थेट प्रक्षेपण बंद ठेवण्यात आले होते. संसदेच्या इतिहासात हा कधीही न विसरता येणारा दिवस आहे. तेलंगण विधेयक लोकसभेत मंजूर करून घेण्यासाठी सरकारने सुरक्षा जवानांचा आधार घेतला. चर्चा व मतदानाचे थेट प्रसारण थांबवण्यात आले. त्याचा आम्ही निषेध करतो. अशाप्रकारचे कारण राज्यसभेतही सादर केले जाईल. मात्र आम्ही ते खपवून घेणार नाही, असेही प्रसाद यांनी सांगितले.
भाजप नेते लालकृष्ण अडवानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या बैठकीतही थेट प्रक्षेपण बंद ठेवण्याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला. थेट प्रक्षेपण बंद ठेवण्यासाठी कोणतेही तांत्रिक कारण नव्हते, तसेच राज्यसभेत असा प्रकार होऊ देणार नाही, असा ठरावच यावेळी मंजूर करण्यात आल्याचे प्रसाद यांनी सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भाजप नेते अरुण जेटली आणि वैंकय्या नायडू यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे.
[EPSB]
अखेर तेलंगण विधेयक लोकसभेत मंजूर
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सादर केलेले तेलंगणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले.
[/EPSB]