एकेकाळी मुंबईत वस्त्रोद्योग जोमात होता तेव्हा तो सर्वाधिक रोजगार देणारा उद्योग होता. वस्त्रोद्योग क्षेत्राची ही जुनीच ओळख अद्यापही कायम असून त्याचे केंद्र मात्र तामिळनाडूतील थिरुपूर शहरात गेले आहे.
थिरुपूर – एकेकाळी मुंबईत वस्त्रोद्योग जोमात होता तेव्हा तो सर्वाधिक रोजगार देणारा उद्योग होता. वस्त्रोद्योग क्षेत्राची ही जुनीच ओळख अद्यापही कायम असून त्याचे केंद्र मात्र तामिळनाडूतील थिरुपूर शहरात गेले आहे. तेथे वस्त्रोद्योग जोरात सुरू असून तब्बल ४४ टक्के लोकांना रोजगार आहे, अशी माहिती २०११च्या ताज्या जनगणनेनुसार उघड झाली आहे. मुंबई, पुणे वगैरे शहरे रोजगार देणारी म्हणून मानली जात असली तरी या यादीत त्यांचे स्थान खूपच खालचे आहे.
४४ टक्के लोक मुख्य कामगार म्हणून नोंदले गेले असल्याने थिरुपूर हे सर्वाधिक प्रमाणात रोजगार देणारे केंद्र म्हणून ५०६ शहरांच्या यादीत सर्वोच्च स्थानी पोहोचले आहे. भारतातील ते सर्वात मोठे वस्त्रोद्योग आणि होजिअरी केंद्र आहे. अन्य सर्वोच्च पाच शहरांत प. बंगालमधील शांतीपूर, तामिळनाडूतीलच इरोड आणि राजापाल्यम तसेच आंध्र प्रदेशातील मंगलागिरी यांचा समावेश आहे. ही सर्व शहरे वस्त्रोद्योगासाठी ओळखली जातात.
सरकारी कर्मचा-यांची सर्वाधिक संख्या असलेले नवी दिल्ली आणि जुन्या व नवीन अर्थव्यवस्थांचे मिळून बनलेले बंगळुरू यांचा मंगलागिरीबरोबर चौथा क्रमांक विभागून आहे.
बिहारमधील तीन तर उत्तर प्रदेशातील सहा शहरे तसेच जम्मू व काश्मिरातील अनंतनाग हे शहर खालून पाच शहरांमध्ये असून तेथे २० टक्क्यांहून कमी लोक नियमित रोजगार असलेले आहेत. नोकरी न करणा-या महिलांचे प्रमाण उत्तर प्रदेशात खूप जास्त असल्याने बहुतेक सर्व उत्तरेतील शहरांमध्ये रोजगार नसलेल्यांचे प्रमाण ७० टक्के इतके उच्च आहे.
या जनगणना पाहणीचा आणखी एक अस्वस्थ करणारा निष्कर्ष हा आहे की, प. बंगालमधील बहुतेक सर्व शहरांमध्ये रोजगारासाठी इच्छुक लोकांची संख्या सर्वाधिक आहे. एकेकाळी बंगालात औद्योगिकीकरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. परंतु त्या राज्याची अवस्था गेल्या काही दशकांत ढासळली आहे. प. बंगालमधील बहुतेक शहरांमध्ये रोजगार इच्छुक लोकांची संख्या २० ते २५ टक्के आहे.