सुरुवातीला सोप्पे वाटणारे ट्रेक नंतर नंतर कठीण होऊन जातात. ते त्यात येणा-या अडथळयांमुळे. त्या वेळी आपण ते पूर्ण करू की नाही, अशी द्विधा मन:स्थिती होऊन जाते. अशाच एका ट्रेकचा हा अनुभव.
ठरल्याप्रमाणे, शुक्रवार, २५ जानेवारी २०१३च्या रात्री निरंजनने मला वडाळ्याहून, सचिन आणि काशिनाथला दादरहून तर हेमंतला ठाण्याहून पिकअप केलं. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस आम्ही ‘त्रिंबकगड-दुर्गभांडार-अंजनेरी’ असा ट्रेक प्लान केला होता. सुसाट गाडी मारत आम्ही हरिहर किल्ल्यामागल्या किर्र्रऽऽऽ वाटेने त्रिंबकेश्वरला पोहोचलो; तेव्हा सकाळचे सहा वाजले होते. पाìकगमध्ये गाडी लावून बंद करताच सगळे चटकन झोपी गेलो.
तासाभरात मला हलवल्यामुळे जाग आली; पण माझी झोप पूर्ण झाली नव्हती. मी लीड करत असल्यामुळे माझी आणि गाडी चालवत असल्यामुळे निरंजनची झोप पूर्ण होणं आवश्यक आहे, असं मित्रांना सांगितलं. झोप पूर्ण न झाल्याने आमच्या ट्रेकचं वेळापत्रक कोलमडून पडलं असलं तरी त्याला पर्याय नव्हता. म्हणून आम्ही सगळे पुन्हा झोपी गेलो.
आणखी तासाभरानंतर, झोप पूर्ण झाल्यावर, फ्रेश होऊन आम्ही ट्रेकच्या तयारीला लागलो. सगळं सामान नीट सोबत घेऊन, गाडी नीट लॉक केली आणि आम्ही निघालो. जवळच एका टपरीवर चहा आणि भजी-पाव खाऊन घेतला. ब्रह्मगिरीवर जाण्याचा मार्ग विचारला. त्या टपरीवाल्याने, ‘गडावर खूप माकडं आहेत’ अशी ‘वॉर्निंग’ देऊन आमचा ट्रेक खडतर करण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघालो; पण आमचं सामान-सुमान पाहून आम्ही किल्ल्यावर जाण्यासाठी आलो आहोत हे कळून आणखी तीन-चार वाटसरूंनी आम्हाला माकडांच्या बाबतीत अधिक माहिती दिली.
गडावरील माकडं, बॅगा पाहून, खाण्याच्या आशेने अंगावर झपाटतात हे सांगून आमचं टेन्शन त्यांनी आणखी वाढवलं. पण आश्चर्य म्हणजे आम्हाला, दूर झाडावर एक-दोन माकडं वगळता एकही माकड आडवं आलं नाही. आठ वाजल्यापासून दोन तासांत आम्ही गडावर पोहोचलो होतो. ब्रह्मगिरीवरच त्रिंबकगड आणि दुर्ग-भांडार असे जुळे गड आहेत. त्रिंबकगड पाहून झाल्यावर आम्ही दुर्ग-भांडारकडे कूच केलं.
डोंगरातून आडव्या जाणा-या अरुंद वाटेवरून आम्ही निघालो. आदल्या दिवशी लागलेल्या वणव्यामुळे गवत जाळून माती भुसभुशीत झाली होती. त्यामुळे पाऊल ठेवल्यावर ती सरकत होती. वाट जीवघेणी करत होती. त्यात काशिनाथने घातलेल्या बुटांना पकड येत नव्हती. एक-दोन ठिकाणी त्या निसरडय़ा वाटेवरून सरकणारे त्याचे बूट पाहून धस्स् होत होतं. घसारा गेल्यावर कातळात, एखाद्या गुंफेप्रमाणे खोदलेल्या दगडी पायऱ्यांनी आम्ही एका चिंचोळ्या कातळी भिंतीवर उतार झालो. अगदी ६ ते १० फूट अरुंद भिंतीच्या दोन्ही बाजूंना सरळसोट द-या होत्या. भन्नाट वा-याला तोंड देत ते अंतर पार केलं. पुन्हा तशाच कोरलेल्या भुयारातून काढलेल्या दगडी पाय-या चढून आम्ही
दुर्ग-भांडारवर पोहोचलो. किल्ल्यावरून खाली कडय़ाच्या पोटात दिसणा-या निवृत्तीनाथांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. साडे-बारा वाजत आले होते; पण भणाणणा-या वा-यामुळे उकाडा जाणवत नव्हता. आम्ही बॅगा उघडून ब्रेड-बटर, केळी, केक्स, पराठे वगर खाऊ लागलो. ‘त्रिंबकगड आणि दुर्ग-भांडारचा ट्रेक कसा मस्त झाला’ या विषयाने ‘ग्रूप डिस्कशन’ सुरू झालं. आदल्या रात्रीच्या प्रसंगाने तसंच झोप पूर्ण न झाल्याने आम्ही सगळ्यांनी अंजनेरीला न जाता परतीचा प्रवास सुरू करायचं ठरवलं. दुर्ग-भांडार, त्रिंबकगड असे एक एक उतरत आम्ही खाली उतरत असताना मात्र माकडांची लुटारू टोळी आम्हाला दिसून आली. पण ती, गड चढणा-या भक्तमंडळींच्या पिशव्या खेचण्यात गुंग असल्याने आम्हाला तिथेही त्रास झाला नाही.
खाली येताच कुशावर्त तीर्थामध्ये डुबक्या मारून पवित्र झालो. जवळच्याच हॉटेलमध्ये गरमागरम चपात्या, वांगी मसाला, पिठलं, झणझणीत डाळ, भातावर मस्त ताव मारला; आणि शनिवारी रात्रीच परतीचा प्रवास सुरू केला. आम्हाला अंजनेरी करता आला नव्हता; पण म्हणतात ना ‘सिर सलामत तो पगडी पचास.’