मुंबईमध्ये १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचे संपूर्ण नियोजन अलिबागमधून करण्यात आले होते.
अलिबाग – मुंबईमध्ये १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचे संपूर्ण नियोजन अलिबागमधून करण्यात आले होते. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार टायगर मेमन हा अलिबागमध्ये जवळपास महिनाभर वास्तव्यास होता. या काळात कस्टम आणि पोलीस विभागातील अधिका-यांना तो भेटला होता. अलिबागमधील एसटीडी बुथमधूनच ठिकठिकाणी संपर्क साधून या देशविघातक कारवाईची आखणी करण्यात आली.
यानंतरच रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी येथे आरडीएक्स उरवण्याचे निश्चित करण्यात आले होते. ही स्फोटके शेखाडीमाग्रे मुंबईत नेण्यात आली होती. त्यानंतर मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते. पोलीस तपासात अलिबाग आणि शेखाडी परिसरातील संबंध समोर आले होते. यात अनेकांना अटक झाली होती.
त्यामुळे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला फाशी दिल्यानंतर अलिबागमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी बॉम्बस्फोटातील जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांनी उशिरा का होईना न्याय मिळाला असल्याची भावना व्यक्त केली.
याकूब मेमन याला फाशी दिल्याबद्दल अलिबागमधील सामाजिक कार्यकत्रे, स्थानिक नागरिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार टायगर मेमन आणि दाऊद इब्राहिम यांच्यावरही अशीच कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले.