त्याच्या गळयामध्ये लाजवाब सूर आहे. डफलीवर त्याचा हात असा काही थिरकतो की ऐकणारे आणि पाहणारे थक्क होऊन जातात.
मुंबई- त्याच्या गळयामध्ये लाजवाब सूर आहे. डफलीवर त्याचा हात असा काही थिरकतो की ऐकणारे आणि पाहणारे थक्क होऊन जातात. त्याच्या आवाजात अशी काही जादू आहे की एखाद्या सराईत गायकाप्रमाणे त्याच्या गळयातील सूर सगळया.नाच मोहित करून टाकतो. पण त्याच्यापाशी संगीतातील सूर असला तरी त्याच्या जीवनातील सूर मात्र आज हरवून गेला आहे. कारण त्याला जग पाहण्याची दृष्टी नाही. तो अंध आहे.
मूळ जालना येथील रहिवासी असलेले राजू आणि त्याची पत्नी लता आपल्या तान्हुल्या मुलीला घेऊन बेलापूर येथे वास्तव्यास आहेत. राजू आंधळा आहे तर त्याची पत्नी त्याच्या जीवनाचा आधार आहे. इवल्याशा मुलीला सांभाळताना त्यांची होणारी कसरत ही तारेवरची मानावी लागेल.
काही जण त्याच्या या गाण्याला दाद म्हणून टाळया नाही तर त्याच्यावर दया म्हणून एक-दोन रुपये देतात आणि त्यामध्ये राजू आणि लता समाधान मानून घेतात. यावेळी त्याची पत्नी पुढे तर राजू पत्नीच्या आधाराने ट्रेनमध्ये भर गर्दीतून डफली वाजवत गाणी म्हणून प्रवाशांचे मनोरंजन करतो आणि प्रवासी या गाण्यांनी मोहित होऊन त्याच्या या सुस्वर गायन कलेला नकळतच पैशाच्या रूपाने मदत करून सलाम करतात.
बेलापूरहून सीएसटीकडे जाणा-या ट्रेनमध्ये ‘जय शेरावाली.. माँ शेरावाली..’ चा सूर असा काही निनादतो की प्रत्येक जण या ठेक्यावर तल्लीन होऊन जातो. दररोज या ट्रेनमध्ये अंबेची गाणी निनादतात. न थांबता, न थकता ट्रेनमधून राजूचा ‘अंबे शेरोवाली’च्या गाण्यांनी दुमदुमणारा स्वर एखाद्या सुरेल गायकाप्रमाणे भासून जातो.
मात्र राजू कुणी श्रीमंत माणूस नाही, सर्वसामान्यांप्रमाणे त्याचं जीवनही नाही. ट्रेनमध्ये भटकंती करून त्यांचा चाललेला उदरनिर्वाह हा अवघ्या मुंबईकरांसाठी मनोरंजनाचा भाग असला तरी त्यांना या गाण्याची पोचपावती म्हणून लोकांनी दिलेल्या एक-दोन रुपयांवरच समाधान मानावे लागत आहे.
आज पाहिले तर मुंबई उपनगरीय रेल्वे ही प्रवाशांसाठी उपयुक्त असली तरी बेरोजगारांसाठी ती उदरनिर्वाहाचे साधन बनली आहे. यामध्ये दृष्टिहीन, अपंगांचाही समावेश असलेला दिसून येतो. महिला, पुरुष आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दिवसभर ट्रेनमधून काही वस्तूंची विक्री करून तर काही आपल्या कलेच्या आधाराने लोकांचं मनोरंजन करून सारं काही पोटासाठी हा मार्ग अवलंबताना दिसत आहेत.
राजू हा जालना येथून मुंबईत पोट भरण्यासाठी आला आहे. त्याला आवाजाची देणगी लाभली असली तरी त्याला दृष्टी नसल्याने तो एकटा ट्रेनमध्ये वावरू शकत नाही, त्यामुळे त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि तान्हुली मुलगी यांच्यासह त्याला हा खडतर प्रवास करावा लागत आहे.
ट्रेनमध्ये चढतानाही त्याची पत्नी लता ही पुढे तर तिच्या आधाराने राजू मागून ट्रेनमध्ये चढतो व डफलीवर ताल धरतो. यामुळे रोज ‘शेरोवाली’च्या गाण्यांनी ट्रेनमधील वातावरण भक्तिमय होऊन जातं. या परिस्थितीतही त्याची पत्नी लता ही हसतमुखपणे या सा-याला सामोरी गेली आहे. ती मुलीला सांभाळून पतीचा आधार बनली आहे.