सिंधुदुर्ग जिल्ह्यात रानटी हत्तींकडून करोडो रुपयांचे नुकसान झाले असून कुडाळ व सावंतवाडी तालुक्यातील सात जणांचा या हत्तींकडून बळी गेला आहे.
कुडाळ- सिंधुदुर्ग जिल्ह्यात रानटी हत्तींकडून करोडो रुपयांचे नुकसान झाले असून कुडाळ व सावंतवाडी तालुक्यातील सात जणांचा या हत्तींकडून बळी गेला आहे.
तीन हत्तींना पकडण्यात कर्नाटकच्या टीमला यश आले असून तिस-या टप्प्यात दोन वेळा हुलकावणी देणारा टस्कर वनविभागाने अथक परिश्रमाने जेरबंद केला आहे.
मात्र या हत्तींकडून मनुष्याचे बळी गेल्याने या हत्तींची आक्रमकता जास्त आहे. हाच हत्ती सध्या आक्रमक होत माहूत व वनविभागाच्या कर्मचा-यांवर धावून येत असल्याने त्याला प्रशिक्षणासाठी चार महिन्यांचा कालावधी लागेल, असे मत म्हैसूर येथील माहूत राघवेंद्र याने सांगितले. उर्वरित दोन हत्ती मात्र माहुतांच्या शिक्षणात तरबेज झाले आहेत.
एखादा कुविख्यात गुंड अनेक खून करून खतरनाक बनतो. त्यांच्याकडून मनुष्यावर नाहक अत्याचार केले जातात. तशाच प्रकारे तिस-या हत्तीची आक्रमकता खतरनाक वाटत आहे.
मनुष्यावर अचानक आक्रमण करून हत्तींनी २००६ मध्ये अशोक कुंभार-पावशी, २००७ मध्ये कृष्णा कदम-निवजे, २००८ मध्ये केशव उमरकर-ओटवणे, विठू जानू खरात-कळणे, १३ एप्रिल २०१४ रोजी सीताराम परब-वाडोस, १८ एप्रिल २०१४ मोहन सडवेलकर-घावनळे, जुलै २०१४ बाबू जानू बुटे-निवजे अशा सात जणांचा बळी घेतला असून आतापर्यंत ११ जणांना जखमी केले आहे.
या मनुष्यांवर आक्रमण करून त्यांचा बळी घेण्यात तिस-या टप्प्यात जेरबंद केलेल्या हत्तीचा हात असण्याची शक्यता या माहुताकडून वर्तविण्यात आली आहे. एखाद्या मनुष्याचा बळी घेतल्यानंतर हत्ती आक्रमक होतो. त्याचप्रमाणे आताही क्रॉलमध्ये बंदिस्त करण्यात आलेला हा हत्ती माहुतांच्या अंगावर धावत जाऊन क्रॉलच्या बारला जोरदार धडक देत आपली आक्रमकता दाखवत आहे.
उर्वरित दोन हत्ती मात्र पूर्णत: माणसाळले असून माहुतांनी सांगितल्याप्रमाणे पुढे, मागे, उभा राहा, बस हे ऐकतात. त्यांच्या प्रशिक्षणाची भाषा हिंदी असून हत्तींना लवरकच प्रशिक्षित करून त्याचा वापर एलिफंड ग्रामसाठी करण्यात येणार असून पर्यटनाला या हत्तीमुळे चालना मिळणार असल्याचे मत माहुतांनी व्यक्त केले.