काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पातळी सोडून टीका करणा-या नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शनिवारी त्यांचे नाव न घेता खडे बोल सुनावले.
रायपूर- काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पातळी सोडून टीका करणा-या नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शनिवारी त्यांचे नाव न घेता खडे बोल सुनावले. छत्तीसगडमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील इनडोअर स्टेडियममध्ये काँग्रेसच्या पक्षकार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतेवेळी त्यांनी राजकारणातील सभ्यतेच्या मर्यादांची आठवण भाजपला करून दिली.
विरोधी पक्षांवर आणि आपल्याला मान्य नसलेल्या त्यांच्या धोरणांवर टीका केलीच पाहिजे, पण त्याच वेळी आपण इतरांसारखे नाही, विशेषत: ज्या पक्षाचे काही नेते दुस-या पक्षाच्या नेत्यांवर टीका करताना खालची पातळी गाठतात त्या भाजपसारखे नाही, याची काळजी घेतलीच पाहिजे, असे सांगत भाजपला टोला लगावला. पक्षाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आणि दुस-याचा अपमान करणारे शब्द वापरू नका, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
भाजप नेत्यांच्या अज्ञानाचे वाभाडे
राजकीय पक्षांनी सत्ताप्राप्तीचे उद्दिष्ट ठेवण्यामध्ये काहीही गैर नाही. मात्र, हे लक्ष्य साध्य करण्यासाठी कोणत्याही पक्षाने सवंग प्रसिद्धीचा मार्ग अवलंबू नये, असे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुका आणि सार्वत्रिक निवडणुकांचे सर्वत्र वारे वाहत आहेत, हे लक्षात घेऊन विरोधी पक्ष विविध प्रकारचे दावे करत आहेत. त्यांचे काही ज्येष्ठ नेते तर अशा काही गोष्टी सांगत आहेत की ज्या वस्तुस्थितीवर आधारित नाहीत. ब-याच वेळी भाजपचे अतिउत्साही नेते देशाचा इतिहास आणि भूगोलही बदलून टाकत असतात, अशा शब्दांत त्यांनी भाजप नेत्यांच्या अज्ञानाचे वाभाडे काढले.
राजकीय प्रतिस्पर्ध्यावर टीका करण्यासाठी वाईट भाषेचा वापर केल्यामुळे विरोधी पक्षांची प्रतिष्ठा वाढणार नाही. – डॉ. मनमोहन सिंग
भाजपचा उथळ खळखळाट
जे लोक मोठमोठे दावे करतात त्यांचे वर्तन उथळ पाण्याप्रमाणे असते. त्यांचा केवळ आवाजच मोठा आहे. त्यांच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता नाही, हे छत्तीसगडच्या जनतेला चांगले ठाऊक आहे, असे ते म्हणाले. ज्या पक्षांची विचारसरणी जातीयवादावर आधारलेली आहे ते पक्ष धर्मनिरपेक्षतेवर बोलून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा पक्षांपासून आपण लोकांना सावध केले पाहिजे, असे पंतप्रधानांनी सांगितले.