तेलंगणा आंदोलन पुन्हा एकदा पेटले असून शुक्रवारी दोन आमदारांनी स्वतंत्र तेलंगणा निर्मितीसाठी विधानभवनावरुन उडी मारण्याची धमकी दिली.
हैदराबाद- तेलंगणा आंदोलन पुन्हा एकदा पेटले असून शुक्रवारी तेलंगणा राष्ट्र समितीच्या कवेती सम्मैया आणि विनय भास्कर या दोन आमदारांनी स्वतंत्र तेलंगणा न झाल्यास विधानभवनावरुन उडी मारण्याची धमकी दिली. तेलंगणा राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांनी आंध्र प्रदेशच्या विधानभवनावर धडक दिली. कार्यकर्त्यांनी विधानभवनाच्या इमारतीवर चढून काळा झेंडा फडकवल्याने प्रकरण आणखी चिघळले आहे.
‘चलो विधानभवन’ या रॅलीला परवानगी देण्यात आलेली नव्हती. मात्र टीआरएसने जबरदस्तीने ही रॅली काढली. तेलंगणाला वेगळ्या राज्याचा दर्जा देण्यासाठी अधिवेशनात प्रस्ताव आणावा, अशी आंदोलकांची मागणी होती. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. विधानभवनात घुसणा-या सर्व आंदोलकांना पोलिसांनी अटक केली असून विधानभवन तसेच परिसरातला बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सुमारे ३० हजार पोलिसांना या परिसरात तैनात केले आहे.
मंदा जगन्नाथ आणि जी. विवेकानंद या खासदारांना पोलिसांनी निजाम क्लबमधून ताब्यात घेतले आहे. दक्षतेचा उपाय म्हणून टीआरएस आणि भाजपच्या शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिका-यांना त्यांच्या कार्यालयातूनच अटक केली आहे. येथील वृत्तवाहिन्या बंद ठेवण्याचे आदेश केबल ऑपरेटरना दिले आहेत.