वाघोबाराया तुम्हारा चुक्याच. सचिनरावांना तुम्ही दर्शन न देऊन आणि ताटकळत ठेवून तुम्ही ग्रेट हिमालयन ब्लंडरसारखी ग्रेट ताडोबा ब्लंडर केली आहे. तुम्ही असे जाणीवपूर्वक केले की आपसूकच होऊन गेले हे. नाही म्हणजे आमच्या जगात आपण फार बिझीबिझी आहोत हे दाखवण्याची फॅशन आहे. विशेषत: सेलिब्रिटिजना त्याचे फार भूषण वाटते.
काय वाघोबाराया (मुक्काम पोस्ट ताडोबा) हे तुम्हास शोभते का हो? तुम्हास काय शोभावे नि काय नाही हा तुमचा अंदर का मामला असला तरी आफ्टरऑल तुम्हारा च्युक्याच असे तुम्हास अजूनही वाटत नाही का? एरव्ही तुम्ही याला असे दिसता, त्याला तसे दिसता. राया, तुमची लय डिमांड आहे म्हणूनच तुम्ही भेटावे, एखादे डेंजरस लूक तुम्ही द्यावे, यासाठी आम्ही सामान्यजन नाही का येत तुमच्या भेटीसाठी कुठून कुठून. थोडे तुमच्या कलाने घ्यावे लागते हे खरेच. पण प्रजेला राजाचा कल कळतो नि प्रजा थोडी कळही सोसते. त्याबद्दल आम्हा सामान्यजनांची तक्रार कुठे आहे. तुमची शेपूट दिसली तरी आम्ही सात जन्मात होणार नाही किंवा झालो नसेल एवढे होतोच की नाही खूश. किंबहुना एखाद्या गर्द झाडाझुडपात जे हलतेय डुलतेय ना ते म्हणजे तुम्हीच असे गाईड ठामपणे सांगतो तेव्हा सुद्धा आमचा ऊर भरून येतो. आम्हा सामान्यांची काही तक्रारच नाही.
राजाची तक्रार करायचीच नसते. एवढे सामान्यज्ञान आमच्याकडे आहेच. शिवाय तुमची तक्रार करायची कुणाकडे हा प्रश्नच नाही का? कारण आपका कोई पीएविए नही. तुम्ही केवळ तुमच्या प्रदेशाचेच नव्हे तर एकमेव दिलाचेही एकमेव राजे. तेव्हा तक्रार करण्यास वाव नाही. आम्हा सामान्य जणांना त्याच्याशी सुद्धा काही देणे-घेणे नाही. पण राया, सामान्यांच्या बाबतीत जे तुम्ही वागता ते असामान्यांच्या बाबत वागून नाही ना चालणार. यावर तुमची गर्जना राहील की माझ्या दरबारात मी कुणास बोलावत नाही. तुम्हीच येता. जो येतो तो सारखाच. सर्वाना समान न्याय.
तुमच्या गर्जनेवर आम्ही बकरीसारखे बेबे करत सांगू शकतो की वाघोबाराया, तुमचं म्हणणं, सर आखोंपे. पण तुम्ही परवा तसे नाही ना वागलात. श्रीयुत सचिनराव तेंडुलकर हे जरी तुमच्याकडे सामान्यजन म्हणूनच दर्शनास आले होते तरी ते आम्हा सामान्यांसाठी असामान्य आहेत. आम्हास इकडेतिकडे हलतडुलत कां होईना किंवा आपली मिशी दाखवत का होईना तुम्ही दिसून जाताच की. एखाद्याच्या ग्रहदेशत त्या दिवशी चंद्र-मंगळ-शनी ग्रहबळ उच्चीचा असेल तर मग विचारूच नका. तुम्ही दहा-पंधरा मिनिटेही दर्शनसुख देऊनच टाकता. पण तुम्ही सचिनरावांच्या बाबत अंमळ भेदभावच केला बुवा. (त्या दिवशी सचिनरावांच्या पत्रिकेत मंगळ वक्री झाला होता की काय?)
वाघोबाराया, तुमच्या दरबारी येणा-या सामान्यांसारखे तुमच्या दृष्टीने सचिनराव सामान्यच असतील, तुम्ही त्यांना दर्शनाचे निमंत्रणही दिले नसेल, पण ते भारतरत्न आहेत. ते रिकी पाँटिंगच्या मते सर डॉन ब्रॅडमनच्या नंतरचे ग्रेट फलंदाज आहेत. कपिलदेवांच्या मते ते सुनील गावस्करांपेक्षा जरा कमीच प्रतीचे आहेत. हरभजन सिंग यांच्यासाठी ते पाजी आहेत. तर ब-याच जणांसाठी दाजी आहेत. आमिर खान यांच्यासाठी सरजी आहेत. अंबानी वहिनींसाठी सर आँखोपे आहेत. अंजली वहिनींसाठी कुठे ठेवू गडय़ा माझ्या दिलाच्या कोहिनुराशी, असे आहेत. मुंबईकरांचे गॉड आहेत. चैन्नईत रजनीकांत सर सुद्धा त्यांच्या स्वाक्षरीसाठी उत्सुक असतात. ते खासदार आहेत. ते महाव्यस्त असतानाही तुमच्या भेटीसाठी आले, तरी तुम्ही मात्र काय त्याचे घेणे-देणे असे करत बसला.
वाघोबाराया हे शोभतं काहो तुम्हास. काय वाटले असेल त्यांना? अहो त्यांची बॅट जरी ढाईकिलो लोहेबिहेकी असली तरी हृदय तसे नाही. ते मेणाहून मऊ आणि गुलाबाहूनही कोमल राहू शकते. अशा या त्यांच्या हृदयात अंजलीवहिनी अलगद जाऊन बसल्या त्याचमुळे. सचिनरावांच्या मेंदूत चोवीस तास क्रिकेट सामना सुरू असताना हृदयात मात्र प्रेमाच्या कवितांच्या चांदण्या थुईथुई नाचत होत्या. तुमचं आमचं प्रेम सेमबीम असतं, असं कविवर्य मंगेश पाडगावकर जरी म्हणून गेले असले तरी सचिनरावांबाबत असंबिसं काही झालं नाही. त्यांच्या हातात बॅट आणि वहिनींच्या हाती पुस्तकांचा ढिगारा. पण बॅट पुस्तकाच्याच प्रेमात पडली ती मेंदूमुळे नव्हे तर कोमल हृदयामुळे. अशा या कोमल हृदयी सचिनरावांना दर्शन न देऊन तुम्ही किती दु:ख दिले असेल याची कल्पना सुद्धा तुम्ही करू शकत नाही.
वाघोबाराया, तुम्हास हे ठाऊक नाही की, आमच्या जगात त्यांच्या दर्शनासाठी लोक आसुसलेले असतात. रस्त्यावरून समजा माधुरी दीक्षित आणि सचिनराव जात असतील तर सचिनरावांकडेच लोकांच्या नजरा जास्त वळतात. सचिनराव म्हणजे क्रिकेटमधल्या या गोलार्धातील नि त्याही गोलार्धातील वाघोबांचा बाप. त्या कुणीतरी तिथे आस्ट्रेलियात राहणा-या शेनवार्न नामे खेळाडूस आमचा हा वाघोबा स्वप्नातही दिसायचा म्हणे. एवढा त्याचा दरारा. एवढी त्याची कीर्ती. पण तुम्हास त्याचे काहीच सोयरसुतक वाटले नाही.
एका वाघाने दुस-या वाघाच्या एरियात जायचे नसते हा नियम झाला हो. तो सुद्धा साडेपंधराव्या शतकातला. पण, चोपडय़ात आणि बखरीत असे बरेच नियम असतात. ते मोडायचे असतात असेच नाही का आपण सारखे इकडून तिकडे ऐकत असतो. तेव्हा तुम्ही जर समजा हा नियम मोडला असता तर तुम्हास उपास घडला असता की किंवा तुमची रवानगी तेलंगणाच्या जंगलात झाली असती?
वाघोबाराया तुम्हारा चुक्याच. सचिनरावांना तुम्ही दर्शन न देऊन आणि ताटकळत ठेवून तुम्ही ग्रेट हिमालयन ब्लंडरसारखी ग्रेट ताडोबा ब्लंडर केली आहे. तुम्ही हे असे जाणीवपूर्वक केले की, आपसूकच होऊन गेले हे. नाही म्हणजे आमच्या जगात आपण फार बिझीबिझी आहोत हे दाखवण्याची फॅशन आहे. विशेषत: सेलिब्रिटिजना त्याचे फार भूषण वाटते. ती लागण तुम्हासही झाली काय? की तुम्हास सचिनराव आले त्याच दिवशी कुणीतरी फितवले. पण वाघोबाराया कुणाच्या खांद्यावरून कुणासाठी नेम धरणे बरोबर आहे का? शिवाय, तुम्हास कोण बरे फितवू शकतो. एखादेवेळेस नागाच्या बिळात हात घालता येईल. पण तुमच्या मिशीला तरी कुणास हात लावता येईल का? वाघोबीन वहिनीसुद्धा पंचवीस वेळा विचार करतील, हे धाडस करण्याचे. याचा अर्थ तुम्हास कुणी फितवले असण्याची शक्यता वाटत नाही.
सेलिब्रिटी काय प्रकरण असते हे तुम्हास ठाऊक असण्याचे कारण नाही. अशी आमची समजूत आहे. ही समजूत जर खोटी असेल तर मग तुम्हास सेलिब्रिटी फोबिया झाल्याचे समजावे लागेल. पण वाघोबाराया एका सेलिब्रिटीच्या भेटीला दुसरा सेलिब्रिटी आला की तो असा दडून बसत नाही. त्याची इच्छा नसली तरी मनी शिव्याबिव्या देत का होईना तो त्याची गळाभेट घेतो. गालगुच्चे घेतो. तू मेरा यारो का यार, मेरा छोटा-बडा भाई वगरे वगरे सांगून फक्त हुंदके द्यायचेच तेवढे कमी ठेवतो. ही संधी का बरे तुम्ही दवडलीत. की तुम्हास ठाऊकच नव्हते की सचिनराव हे मोठे सेलिब्रिटी आहेत म्हणूनशान.
आता आली का नाही पंचाईत. असे जर असेल ना तर आता वेळ आली आहे तुम्हास बदलण्याची. एकटेबिकटं राहणं सोडा हो आता. राजाने आपल्या तो-यातच असावे, पण या तो-याला तुरेबिरे चढवणारे अवतीभवती भालदार चोपदार नको का सोबत. त्यात एखादा पीए असावा. त्याने तुम्हास येणा-या- जाण्या-याविषयी ब्रिफ करावे. माझ्या प्रदेशाचा मीच एकटा काय तो मालक. हा बाबा आदम के जमानेका हट्ट म्हणा, नियम म्हणा आता सोडा बघू. त्यासाठी आपल्या एरियात गोल फिरून सू करून बांऊड्री आखण्याची सवय सुद्धा तोडा.. अशी सार्वजनिक सू करून तुमच्या सारख्या ओरिजनल स्मार्ट हिरोने अस्वच्छतेला निमंत्रण का बरे द्यायचे. सचिनराव स्वच्छतेचे ब्रँड एॅम्बेसेडेर आहेत हे तर त्या दिवशी तुम्हास कळून त्यावरच उपदेश देतील ही तर शंका तर आली नाही ना. म्हणून तर तुम्ही दडून बसलात नाही ना.
काहीही असो, तुम्ही सचिनरावांना ताटकळत ठेवून व दर्शन न देऊन तुम्हारा चुक्याच असेच पुन्हा म्हणावेसे वाटते. आता आम्ही तुमचे ब्रँड एॅम्बेसेडेर अमिताभसरांकडे तुमची तक्रार करणार आहोत. ते तुमच्या भेटीस येतील तेव्हा त्यांना सॉरी म्हणा. नाही तर पुन्हा तुम्ही आगाऊपणा करून त्यांनाही ताटकळत ठेवत, मेरे अंगने में तुम्हारा का क्या काम है असे गाणे गुणगुणत भाम्रागडच्या प्रेयसीची वाट बघत झुडपात दडून बसाल.