ती सध्या काय करते? कुठे असेल ती? कशी असेल ? आता कधी भेटली तर काही बोलेल का आपल्याशी? हा प्रश्न वाचल्यावर स्वाभाविकपणे आकस्मिकपणे हा प्रश्न मनात निर्माण झालेला पुरुष आणि त्याच्या त्या प्रश्नातली मुलगी किंवा स्त्री, अशी दोन माणसं डोळय़ांसमोर येतात. या व्यक्तिरेखांपाठोपाठ एक कथा येते आणि स्वाभाविकपणे ज्याच्या त्याच्या कल्पनाशक्तीनुसार स्थल आणि कालसुद्धा येतं.
मनातल्या आठवणींवरचा पडदा उघडतो आणि अचानक जणू एक नाटकाचा खेळच सुरू होतो. खूप लहानपणी दोन वेण्या घालणारी आणि घा-या डोळय़ांची किंवा तरुण वयात भुरळ घालणारी, कॉलेजातली काळीसावळी पण ठसठशीत नाक डोळय़ांची किंवा फुलू लागलेल्या पुरुषत्वाला आव्हान देणारी, अशी कुणीही. खूप रोमँटिक आहे हे सगळं.
मलासुद्धा असाच प्रश्न दोन दिवसांपूर्वी अकस्मात माझे जुनेपाने कागदपत्र आवरताना पडला. बरंच शोधलं पण पाहिजेत ते कागद काही मिळेनात, मी खूप अस्वस्थ झालो. मग अगदी मनाच्या तळापासून एकसारखं वाटत राहिलं, ‘कुठे असेल ती?’, ‘सध्या काय करत असेल?’ नाही, नाही मुलगी नाही! मी लिहिलेली पहिली एकांकिका, ‘कैफियत’. सुरुवातीची पानं आखीव बंदांवर हाती लिहिलेली आणि नंतरची काही को-या कागदांवर जुनाट टाईप रायटरवर टाईप केलेली. एकूण १३, १४ पानांमध्ये असलेली माझी एकांकिका.
कागद आवरता, आवरता अचानक तिची आठवण झाली आणि ती न दिसल्यानं आठवणीतून रूतून बसलेली ‘ती’ एकदम आठवणींच्या पृष्ठभागावर आली. अधिक विचार करायला लागलो तर लक्षात आलं, कथानक काय होतं नक्की ते आठवेनात पण बाकी काही गोष्टी अंधुकशा आठवायला लागल्या.
१९९६ च्या दरम्यान आम्ही कैफियत ही एकांकिका, एका नावीन्यपूर्ण अशा स्पर्धेत, सावंतवाडीच्या बाप्पा धारणकर एकांकिका स्पर्धेमध्ये सादर केली होती. म्हणजे, ४८ तास अगोदर ते एक शब्द देणार होते आणि त्या शब्दाला धरून तो २०,२५ मिनिटांचं सादरीकरण करायचं होतं, हे आठवत होतं.
आमचं सादरीकरण चांगलं झालं होतं, परीक्षकांनी खूप कौतुक केलं होतं आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीसही दिलं होतं, हे सगळं आठवत होतं, पण काही केल्या संपूर्ण असं कथानक आठवत नव्हतं. म्हणजे हे असं झालं नाही का, की बाकी सगळं आठवावं, पण त्या मुलीचं नेमकं रूप काही आठवू नये, याला काही अर्थच नाही.
मनाला बोचणी लागली, वाटत राहिलं, हे काही बरं नाही! मग एकसारखा आठवणींना ताण देत राहिलो, तसं थोडं, थोडं आठवत गेलं. वेश्येची मुलगी, आपल्या मुलीला तिने त्या जगापासून सुरक्षित ठेवलेलं. लहानपणापासून चांगलं आयुष्य जगलेली, शिकलेली. एक मुलगा तिच्या प्रेमात पडतो, लग्न करतो आणि मग ती आई होण्याच्या वळणावर असताना, त्याला तिच्या आईविषयी कळतं,त्यावेळी समाजाला घाबरून तिला सोडून देणारा तिचा नवरा. यातून निर्माण होणारं नाटक. एकूण पात्र तीनच.
बाकी प्रवेश आणि डायलॉग काही केल्या आठवेना. मग वाटायला लागलं, नीट आठवत नाही, याचाच दुसरा अर्थ आपण तिला प्रेमानं, निरखून कधी पाहिलीच नाही का? त्यावेळी स्पर्धेची आणि ग्रुपची आवश्यकता म्हणून लिहिलं आणि मोकळे झालो. असं झालं का? म्हणजे मी तेवढंच लिहिलं असतं आणि मोकळा झालो असतो तरी असं झालं असतं तरी हरकत नव्हती, माझं ‘कैफियत’ ही एकांकिका लिहिणं म्हणजे एक अपघात मानता आलं असतं, पण..
‘ती’ सध्या काय करते? थोडया वेगळया दृष्टिकोनातून पाहिलं तर? (व्हा थोडं गंभीर व्हा!) (मी असं म्हटलं की, बायको म्हणते, कशाला? तुम्ही स्वत:च्या चेह-यावर कायम असलेली प्रश्नचिन्ह दुस-यांच्या चेह-यांवर का चिकटवता? राहू दे ना त्यांना थोडं हसतंखेळतं तर ‘ती’ सध्या काय करते? चा विचार करीत असताना, या एकाच प्रश्नामध्ये अनेक प्रश्न आणि उत्तर दडलेली आहेत, नाही का?
ती त्यावेळी कशी होती? याचं उत्तर शोधताना, अभावितपणे आपण त्यावेळी कसे होतो, हे सुध्दा आपण आठवत राहातोच ना? तसंच आता ‘ती’ आपल्याला भेटली तर आपल्याकडे पाहून तिची आणि तिच्याकडे पाहून आपली, काय रिअॅक्शन असेल, या प्रश्नात सुध्दा आपण असतोच ना? तिची आठवण येत राहाते किंवा परत भेटावी असं वाटत राहातं कारण आता ती कशी दिसेल आणि कशी असेल, याचीही आपल्याला खूप उत्सुकता असते.
थोडक्यात काय दोघांच्याही आयुष्याचा चित्रपट आपल्या समोरून सरकून जातो.
माझ्या आठवणीतली ‘ती’ म्हणजे मी लिहिलेली पहिली एकांकिका. मला तर वाटतं, प्रत्येक कलाकाराच्या बाबतीत हे असं होत असणार. व्हायला हवं! मग तो कवी, चित्रकार, छायचित्रकार, अभिनेता असो वा आणखी कुणी.
कोणत्याही कलाकाराला आपली पहिली कलाकृती, अवचितपणे सतत आठवत राहायलाच हवी. गायकाला असं सारखं सारखं आठवत राहिलं पाहिजे आपण गायलेलं पहिलं गाणं, त्यातला गोडवा, नवथरपणा आणि हूरहूर. लेखकाला आठवत राहला पाहिजे लिहिताना झालेला विषय संपविण्याचा उताविळपणा पण त्यामागचं त्या विषयावरचं प्रेम.
माझा एक कवी मित्र आहे. वयानं लहान आहे. आठवी, नववीमध्ये असल्यापासून लिहितो म्हणे, छान लिहितो, मुक्तछंदात लिहितो. कवितेविषयीच्या त्याच्या जाणिवा खूप आतून आहेत, त्याच्या कवितेचं रूप मोकळं आणि प्रवाही आहे. परवा भेटला तेव्हा असंच पहिलटकरीनवरून विषय निघाला तर थोडासा नव्र्हस झाला, म्हणून मी विचारलं तर पटकन् म्हणाला, सर माझ्या पहिल्या कविता सोडून दिल्या मी, निर्माल्यासारख्या नदीच्या पात्रात.
सुरुवातीला किती बालिशपणे लिहिल्या मी, कुणाची तरी भ्रष्ट नक्कल आणि शब्द जुळवण्याचा नुसता आटापिटा. काही क्षण शांत बसल्यावर मी त्याला विचारलं, पण त्यावेळी त्यांनी तुला आनंद दिला होता ना? तू कवी असल्याची जाणीव त्याच बाळबोध कवितांनी पहिल्यांदा करून दिली होती ना? यावर तो शांत होऊन विचार करीत राहिला. माझी आजी म्हणायची, शेंडेफल म्हणून शेवटच्या मुलाचं जास्त कौतुक होतं, पण आई पहिल्या मुलाचा थोडा जास्त आदर करते, कारण तिला आईपणाचा अनुभव त्यानं पहिल्यांदा दिलेला असतो.
कलाकार मग तो कुठल्याही क्षेत्रातला असो, त्याला आपली पहिली कलाकृती मधूनच आठवत राहिली पाहिजे, त्यानंतरच्या प्रत्येक पावलावर कलाकारानं तिचं अस्तित्व तपासून पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ती पहिली कलाकृतीच तुम्हाला सांगू शकते, तुमची कलाकार म्हणून पावलं पुढे पडत आहेत, तुम्ही तिथल्या तिथं घोटाळत आहात की होतात तिथून मागे जात आहात ते! आणि म्हणूनच विस्मरणात गेली असली तरी, आपल्याला केव्हातरी प्रश्न पडायलाच हवा, ‘ती’ सध्या काय करते?