रक्तपेढीमध्ये तीन आठवडयांहून अधिक काळ साठवलेलं रक्त रुग्णाला देणं घातक असून, त्यामुळे रक्तवाहिन्यांच्या कार्यात अडथळे निर्माण होत असल्याचं नव्या संशोधनात आढळलं आहे.
रक्तपेढीमध्ये तीन आठवडयांहून अधिक काळ साठवलेलं रक्त रुग्णाला देणं घातक असून, त्यामुळे रक्तवाहिन्यांच्या कार्यात अडथळे निर्माण होत असल्याचं नव्या संशोधनात आढळलं आहे. यापूर्वी रक्तपेढीमध्ये सहा आठवडयांपर्यंत साठवलेलं रक्त सुरक्षित मानलं जात होतं. मात्र, अलीकडेच झालेल्या संशोधनात रक्त साठवणुकीचा हा कालावधी सुरक्षित नसून तीन आठवडयांपेक्षा जास्त काळ साठवलेलं रक्त हृदय शस्त्रक्रिया आणि इतर नाजूक शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांवर विपरीत परिणाम करत असल्याचं दिसून आलं आहे.
जास्त काळ साठवलेलं रक्त घातक का ठरू शकतं, याचं स्पष्टीकरण शास्त्रज्ञांनी दिलं आहे. रक्तामध्ये असलेला नायट्रिक ऑक्साइड हा घटक रक्तवाहिन्यांमध्ये मोकळेपणा आणत असतो व त्यामुळे रक्ताचं वहन सहजपणे होत असतं. मात्र, तो रक्तामध्ये जास्त काळ टिकून राहू शकत नाही. त्यामुळेच जास्त काळ साठवलेल्या रक्तामध्ये या घटकाची कमतरता असल्याने असे रक्त रुग्णाच्या शरीरात गेल्यास रक्तवाहिन्यांमधून अशा रक्ताचे योग्य प्रकारे वहन होऊ शकत नाही.
अमेरिकेमध्ये एमरी रुग्णालयात याबाबतचं संशोधन करण्यात आलं. या रुग्णालयात विविध आजारांवर उपचार घेत असलेल्या ४३ रुग्णांवर रक्त संक्रमणाच्या चाचण्या घेण्यात आल्या. हे रुग्ण कर्करोगावर उपचार घेण्यासाठी आणि इतर शस्त्रक्रियांसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यापैकी काही रुग्णांच्या शरीरात ताजं रक्त (१० आठवडयांपेक्षा कमी काळ साठवलेलं) किंवा जुनं रक्त (तीन आठवडयांहून अधिक काळ साठवलेलं) देण्यात आलं. त्यानंतर या रुग्णांच्या रक्तवाहिन्यांमधून रक्तप्रवाह कशा प्रकारे वाहत आहे, याचं ‘फ्लो मेडिएटेड डायलेशन (एफएमडी)’ या तंत्राद्वारे मापन करण्यात आलं. या तंत्राद्वारे रक्तवाहिन्यांमधील आतल्या बाजूच्या त्वचेची क्षमता तपासली जाते. ही त्वचा जर निरोगी असेल तर रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे होतो. ही प्रक्रिया नायट्रिक ऑक्साइडवरही अवलंबून असते. निरोगी तरुण व्यक्तींमध्ये एफएमडी १० टक्क्यांपर्यंत असतं, तर रुग्णालयात दाखल केलेल्या व्यक्तींमध्ये हेच प्रमाण सरासरी पाच टक्के असतं.
ज्या रुग्णांना जुनं रक्त देण्यात आलं होतं, त्यांचं एफएमडी निम्म्यावर म्हणजे २.४ टक्क्यांवर आलं तर ज्या रुग्णांना ताजं रक्त देण्यात आलं होतं त्यांच्या एफएमडीवर कोणताही परिणाम दिसून आला नाही.
मेदयुक्त अन्न (फॅटी मील) खाल्ल्यामुळे रक्तवाहिन्यांवर जो परिणाम होतो तशाच प्रकारचा हा परिणाम जुनं रक्त दिल्यामुळे होत असल्याचं दिसून आलं. नायट्रिक ऑक्साइड हिमोग्लोबिनद्वारे बाहेर टाकल्या जाणा-या ऑक्सिजनसाठी देखील महत्त्वाचा असतो. लाल रक्तपेशींमध्ये नायट्रिक ऑक्साइड असतो व साठवणुकीनंतर काही काळाने तो निघून जातो. त्याचबरोबर तीन आठवडयांपेक्षा जास्त काळ साठवलेल्या रक्तातील लाल रक्तपेशींमधील लवचिकपणाही नष्ट होत असल्याचं या संशोधनात दिसून आलं आहे.