कॅगच्या अहवालात शेतक-यांच्या कर्जमाफी योजनेत झालेल्या घोटाळ्यावरुन विरोधकांनी बुधवारी संसदेत गोंधळ घातला.
नवी दिल्ली – कॅगच्या अहवालात शेतक-यांच्या कर्जमाफी योजनेत झालेल्या घोटाळ्यावरुन विरोधकांनी बुधवारी संसदेत गोंधळ घातला.
सकाळी ११ वाजता संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरु झाले. पण विरोधकांनी गोंधळ घातल्याने दोन्ही सभागृह दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. लोकसभेत भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या. त्याला सीपीएमच्या नेत्यांनी पाठिंबा देत सभागृहात गोंधळ घातला. अण्णा द्रमूकच्या नेत्यांनीही तामीळ लोकांवर श्रीलंकेत होत असलेल्या अत्याचाराचा मुद्दा सभागृहात उचलून धरला.त्यामुळे सभागृह दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
दुपारी १२ वाजता लोकसभेचे कामकाज सुरु होताच विरोधकांच्या गोंधळातच अध्यक्ष मीरा कुमार यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. शेतक-यांच्या कर्जमाफी योजनेत झालेल्या गोंधळाची चौकशी करत संबंधित अधिका-याला शिक्षा करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. राज्यसभेतही याच मुद्दयावरुन विरोधकांनी गोंधळ घातल्याने अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी राज्यसभा दुपारपर्यंत तहकूब केली.
आधी पेट्रोल दरवाढ आणि आज शेतक-यांच्या कर्जमाफी योजनेतील गैरव्यवहार या दोन मुद्दयावर विरोधकांनी गोंधळ घातल्याने सलग तीन दिवस संसदेचे कोणतेही कामकाज होऊ शकले नाही.
शेतक-यांच्या कर्जवाटप योजनेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही – शरद पवार, केंद्रीय कृषीमंत्री