जम्मू-काश्मीर आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यासाठीचे मतदान मंगळवारी पडले.
श्रीनगर/रांची – जम्मू-काश्मीर आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यासाठीचे मतदान मंगळवारी पडले. झारखंडमधील १७ जागांसाठी विक्रमी ६१ टक्के तर जम्मू-काश्मीरमधील १६ जागांसाठी ५८ टक्के मतदान झाल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितले.
काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच मतदान केंद्रावर कडेकोड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
या तिस-या टप्प्यात जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्री आणि दहा आमदारांसह १४४ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.
आज राज्यातील बडगाव, फुलवामा आणि बारामुल्ला जिल्ह्यातील १६ जागांसाठी मतदान झाले. सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून कडाक्याच्या थंडीतही मतदान केंद्राबाहेर मतदारांमध्ये उत्साह दिसून आला.
झारखंडमध्ये विक्रमी ६१ टक्के
झारखंडमधील १७ जागांसाठी तिस-या टप्प्यात विक्रमी ६१ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. या सह राज्यातील २८९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. या टप्प्यात काही नक्षलग्रस्त भागातही मतदान केंद्र होती, त्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.