फिल हय़ुजच्या अकाली मृत्यूच्या पार्श्वभूमीवर कसोटी मालिकेचे वेळापत्रक बदलल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) आता तिरंगी मालिकेतील पहिले दोन सामने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
अॅडलेड – फिल हय़ुजच्या अकाली मृत्यूच्या पार्श्वभूमीवर कसोटी मालिकेचे वेळापत्रक बदलल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) आता तिरंगी मालिकेतील पहिले दोन सामने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्या बदलानुसार, १६ जानेवारीला सलामीच्या लढतीत (सिडनी) यजमान ऑस्ट्रेलिया इंग्लंडशी दोन हात करेल. त्यानंतर १८ जानेवारीला मेलबर्नवर भारतीय संघ त्यांची पहिली लढत (वि. ऑस्ट्रेलिया) खेळेल. बदललेल्या वेळापत्रकानुसार, प्रत्येक संघ चार सामने खेळेल. अंतिम लढत एक फेब्रुवारीला पर्थवर (वाका) रंगेल. पहिल्या दोन वनडेसाठीचे आगावू तिकिट खरेदी करणा-यांना पूर्ण रक्कम परत केली जाणार आहे.
नियोजित वेळापत्रकाप्रमाणे, ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड यांच्यात होणा-या तिरंगी मालिकेला १२ जानेवारीला सिडनीतून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया लढतीने सुरुवात होणार होती. मात्र हय़ूजच्या मृत्यूनंतर कसोटी मालिका पुढे ढकलण्यात आली. कसोटी मालिकेनंतर तिरंगी मालिकेत थोडा बदल करताना ऑस्ट्रेलिया बोर्डाने दोन सामने कमी करताना भारतासह इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना सरावाची संधी उपलब्ध करून दिली आहे. तिरंगी मालिकेपूर्वी दोन्ही संघ वनडे सराव सामने खेळतील.
‘क्रिकेटपटूंवर कुठलेही दडपण आणलेले नाही’
हय़ुजच्या मृत्यूनंतर क्रिकेटपटूंची मानसिकता समजून घेतली जात आहे. मालिका लवकरात लवकर सुरू करण्यासाठी बोर्डातर्फे क्रिकेटपटूंवर कुठलेही दडपण आणले जात नसल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे (सीए) मुख्य कार्यकारी जेम्स सदरलँड यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
‘‘हय़ुजच्या मृत्यूचा धक्का सर्वाना बसला आहे. मात्र प्रत्येक जण त्यातून सावरत आहे. क्रिकेट खेळण्यासाठी तयार आहोत, असे प्रत्येक क्रिकेटपटूने सांगितल्यानंतरच आम्ही मालिकेची पुनर्रचना केली आणि त्यात बदल केला,’’ असे सदरलँड म्हणाले.