पालघर जिल्ह्यातील कोसबाड येथे ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांनी केलेले बालशिक्षणाचे कार्य अनेकांसाठी आदर्श ठरले आहे.
मुंबई- पालघर जिल्ह्यातील कोसबाड येथे ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांनी केलेले बालशिक्षणाचे कार्य अनेकांसाठी आदर्श ठरले आहे. या दोन महान शिक्षणतज्ज्ञांनी आदिवासी भागात केलेले हेच कार्य आता माहितीपटातून पाहायला मिळणार आहे. ‘कोसबाडच्या टेकडीवरून’ असे नाव असलेल्या या माहितीपटाची निर्मिती कोसबाडच्या ग्राम बाल शिक्षा केंद्राने केली आहे.
डहाणूपासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोसबाड या लहानशा गावात पद्मभूषण ताराबाई मोडक यांनी १९५७मध्ये बालशिक्षणाच्या कार्याला सुरुवात केली. गांधीजींना प्रेरणास्रेत मानणा-या ताराबाईंनी अनेक अडचणींवर मात करत दुर्गम जंगलातील या गावात ‘ग्राम बाल शिक्षा केंद्र’ सुरू करून आदिवासींमध्ये बालशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. पुढे पद्मश्री अनुताई वाघ त्यांच्या साथीला आल्या आणि या दोघींनी अनेक शैक्षणिक प्रयोग केले. या दोघींनी इथे बालवाडया आणि कुरणशाळा, अंगणवाडय़ा सुरू केल्या. माँटेसरीला पर्याय म्हणून पुढे आलेली ‘बालवाडी’ ही संकल्पना पुढे देशातच नव्हे तर विदेशातही पोहोचली. इथे असलेल्या अंगणवाडी शिक्षण केंद्रात प्रशिक्षण घ्यायला तेव्हा देशभरातून शिक्षक येत. आज इथे अनेक संस्था उभ्या राहिल्या असून त्यात विविध प्रकारचे शैक्षणिक प्रयोग होत असतात. ताराबाई आणि अनुताई कोसबाडमध्ये आल्या तेव्हा इथे काय परिस्थिती होती, आदिवासी मुलांना त्यांनी कसे शिकवले, आजूबाजूच्या परिसरातील गोष्टींचा खेळणी म्हणून वापर करून इथे कुरणशाळा कशी सुरू झाली, सुरुवातीच्या अडचणींवर त्यांनी कशी मात केली हे सगळे तीस मिनिटांच्या माहितीपटात पाहायला मिळणार आहे.
ताराबाई आणि अनुताई यांच्याबरोबर काम करणा-या शिक्षकांच्या मुलाखती, कोसबाड परिसर व तिथल्या शैक्षणिक उपक्रमांच्या चित्रणातून हे उलगडणार आहे. संजीवनी प्रॉडक्शन प्रस्तुत या माहितीपटाचे लेखन-दिग्दर्शन सुरेश चव्हाण यांनी, तर छायाचित्रण व संकलन अभिराज राजाध्यक्ष यांनी केले आहे. पार्श्वनिवेदन पौर्णिमा मनोहर यांचे आहे. या माहितीपटाच्या निर्मितीत शशिकला युवोत्कर्ष न्यास, अनुताई यांचे भाचे श्याम वाघ, राजकुमार नवगिरे यांनी सहकार्य केले आहे. माहितीपटाचे लेखक-दिग्दर्शक सुरेश चव्हाण यांनी सांगितले, ‘ताराबाई व अनुताई यांच्या कामाबद्दल आजच्या पिढीला फारशी माहिती नाही. कारण त्यांचे निधन होऊन बरीच वर्ष झालीत, परंतु त्यांच्या कार्याबद्दल बरीच उत्सुकता आहे. अनेक ठिकाणी फिरताना मला हे जाणवलं. म्हणून आम्ही त्यांच्या कार्यावर हा माहितीपट तयार करण्याचं ठरवलं.’ २४ डिसेंबरला या माहितीपटाच्या डीव्हीडीचे अनावरण झाले आहे. ताराबाई व अनुताई यांचे कार्य नव्या पिढीला कळावे, यासाठी महाराष्ट्रातील शाळा-कॉलेजांतून तो दाखवला जावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.