तानिया सचदेवच्या दमदार फॉर्ममुळे भारताच्या महिलांनी येथे सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये बुधवारी आठव्या फेरीत व्हिएतनामवर विजय मिळवला
इस्तंबूल – तानिया सचदेवच्या दमदार फॉर्ममुळे भारताच्या महिलांनी येथे सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये बुधवारी आठव्या फेरीत व्हिएतनामवर विजय मिळवला. याबरोबरच भारत आता रशियासोबत संयुक्तपणे दुसरे स्थान पटकवत जेतेपदाच्या शर्यतीतही आला आहे. आता तीन फे-या बाकी आहेत. मात्र 9व्या फेरीत भारतासमोर शुक्रवारी (7 सप्टेंबर) बलाढय रशियाचे आव्हान आहे.
तत्पूर्वी, भारताने व्हिएतनामचा 2.5-1.5 या फरकाने पराभव केला. दिल्लीच्या तानियाने भारताच्या विजयात आतापर्यंत मोलाचे योगदान देताना आठपैकी सात लढती जिंकल्या आहेत. इशा करवडे आणि मेरी अॅन गोमेस यांनीदेखील विजय नोंदवले. डी. हरिकाला मात्र बरोबरीत समाधान मानावे लागले.
भारताच्या पुरुषांना मात्र प्रभावी कामगिरी करण्यात अपयश येत आहे. त्यांना सर्बियाकडून 2-2ने बरोबरी स्वीकारावी लागली. के. शशीकिरणला स्वीकारावा लागलेला पराभव हे भारताचे अपयश ठरले. पी. हरिकृष्ण आणि परिमार्जन यांचे डाव बरोबरीत सुटले. मात्र जी. एन. गोपालने विजय मिळवल्याने भारताला पराभव टाळता आला. भारताची आता 9व्या फेरीत जॉर्जियाशी लढत होणार आहे. जेतेपदाच्या शर्यतीत राहण्यासाठी भारताला ही लढत जिंकणे गरजेचे आहे.