रायगड जिल्ह्यातील शेतक-यांनी झोडपणी धोरण अवलंबले आहे. सुरुवातीला अवकृपा दाखवल्यानंतर अधूनमधून बरसणा-या पावसामुळे यंदा कशीबशी करत कोकणातील शेतक-यांनी लावणी आटोपली
अलिबाग – ‘आली लहर तर केला कहर’, असा लहरीपणा दाखवत परतीच्या वाटेवर असलेल्या पावसाने मागील काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, रोहा, अलिबाग, पनवेल भागात झोडपणी धोरण अवलंबले आहे. सुरुवातीला अवकृपा दाखवल्यानंतर अधूनमधून बरसणा-या पावसामुळे यंदा कशीबशी करत कोकणातील शेतक-यांनी लावणी आटोपली. मात्र लावणी आटोपल्यानंतर (बेणनी) शेतातील गवतकाडी काढण्याच्या कामाला लागलेल्या जिल्ह्यातील शेतक-याला काही दिवसांपासून झोडपून काढणारा पाऊस शेताच्या बांधावरही उभा राहू देत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे परतीच्या वाटेवर असलेला हा पाऊस अथक परिश्रमाने उभी केलेली शेती भुईसपाट करून ‘हाता-तोंडाशी आलेला घास’ हिरावून घेतो की काय, अशा चिंतेने गावोगावच्या शेतक-यांना ग्रासले आहे.
पावसाचे तीन महिने उलटून गेले तरी, जून ते ऑगस्टदरम्यान केवळ 70 टक्केच पाऊस जिल्ह्यात झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत रायगडमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने भातशेती ब-यापैकी तरारून आली आहे. भाताच्या लोंब्याही तग धरण्याच्या स्थितीत असताना गेले काही दिवस हल्लाबोल करणा-या पावसामुळे उभं पीक आडव होतंय की काय, असे चिंतेचे ढग गावोगावच्या शेतक-यांभोवती जमू लागले आहेत. परतीचा पाहुणा असलेल्या पावसाने आणखी काही दिवस मुक्काम वाढवल्यास शेतीचे नुकसान होऊ शकते, अशी भीती जिल्हा कृषी विभागानेही वर्तवली आहे. रायगड जिल्ह्यात गरवा, निमगरवा व हळवा या भाताच्या जातीचे मोठया प्रमाणावर पीक घेतले जाते.
आजघडीला लावणी आटोपून जवळपास 75 दिवसांचा काळ लोटला आहे. साधारण 90 ते 110 दिवसांत हळव्या जातीचे पीक तग धरून भाताच्या लोंबी पोटरी धरतात. सध्या हळव्याचा भात निसवण्याच्या (तग धरण्याच्या) स्थितीत आहे. आतापर्यंत झालेला पाऊस हा भात पिकासाठी समाधानकारक आहे. मागील वर्षी ऑगस्टअखेरीस रायगड जिल्ह्यात सुमारे 3157.62 मि. मी. पाऊस पडला होता. यावर्षी आतापर्यंत 2139.39 मि. मी. इतकाच पाऊस झाला आहे. हे प्रमाण 70.42 टक्के इतकेच आहे. रायगडमधील काही तालुक्यांत पावसाने मागील वर्षीच्या तुलनेत निम्मीच सरासरी गाठली आहे. मागील चार दिवसांत पडलेल्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाने सरासरी ओलांडली आहे. सर्वात कमी 51.27 टक्के इतक्या पावसाची नोंद पेण तालुक्यात झाली आहे. मुरुडमध्ये 57.17, उरण 58.04, पनवेल 60.80, अलिबाग 60.34 टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पाऊस पुरेसा न झाल्याने यंदा जिल्ह्यातील धरणांत केवळ 95 टक्केच जलसाठा जमा झाल्याचे लघुपाटबंधारे विभाग कोलाड यांनी कळवले आहे.
‘ठाण्यात दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही’
ठाणे जिल्ह्यातील 95 टक्के पेरणीकामे पूर्ण झाली असून पिकांची स्थिती चांगली असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याची ओरड केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नाईक यांच्या उपस्थितीत गुरुवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती नसून दुष्काळ जाहीर करण्याची गरज नसल्याचेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. हा पाऊस टप्प्याटप्प्याने झाल्याने तो पिकांसाठी पोषक आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदा चांगले पीक येईल, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला.