‘धरणे उशाला पण कोरड घशाला’ अशी कायम व्यथा असलेल्या धरणांच्या शहापूर तालुक्यात अनेक गावे भीषण पाणीटंचाईने अक्षरक्ष: पाणी-पाणी करत आहेत.
शहापूर – ‘धरणे उशाला पण कोरड घशाला’ अशी कायम व्यथा असलेल्या धरणांच्या शहापूर तालुक्यात अनेक गावे भीषण पाणीटंचाईने अक्षरक्ष: पाणी-पाणी करत आहेत. मात्र मुंबईकरांची तहान भागवणा-या शहापूरकरांकडे सरकार सुज्ञ भावनेनेही पाहत नाहीत. ही गंभीर बाब असून राज्यकर्त्यांना याची जाणीव करून देण्यासाठी शहापूरकरांनी मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
शहापूर तालुक्यात धरणे बांधून येथील जनतेला बेघर करण्यात आले आहे. तानसा, वैतरणा, भातसा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन न करता नव्याने प्रकल्प बांधण्याचा सपाटा म्हणजे येथील जनतेला उद्ध्वस्त करण्याचे सरकारी धोरण आहे, असा आरोप कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी केला आहे. शहरातील धरणे कमी झाली म्हणून नव्याने काळू, शाई, गारगाई प्रकल्पांचे नियोजन सुरू आहे. एकीकडे कोयना, भातसा प्रकल्पग्रस्तांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. त्यात आता पुन्हा जनतेला रस्त्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
आता आंदोलन करून मुंबईकरांचे पाणी बंद केले पाहिजे. तरच त्यांना शहापूरकरांच्या व्यथा समजतील, असे आवाहनही त्यांनी केले. नव्याने सुरू असलेल्या नदीजोड प्रकल्पातून आपले पाणी गुजरातकडे नेण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोपही विश्वनाथ पाटील यांनी यावेळी केला. शहापूरच्या विकासासाठी दरवर्षी करोडोंचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करताना ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनीही शहापूरकरांना पाठिंबा दिला आहे.
शहापूर तालुका दत्तक घ्या!
मुंबईची तहान भागवणा-या शहापूरकरांना पाण्यासाठी तडफडावे लागत आहे. त्यांना दळणवळणाच्या सुविधेसाठी पुरेसा निधी नाही, शिक्षणासाठी पुरेसा पैसा नाही की नोकरीची हमीही नाही. शहापुरातील जलसंपत्तीचा उपयोग करायचा असेल, तर शहापुरातील कष्टकरी, कामकरी, शेतकरी वर्गाच्या विकासासाठी स्वतंत्र निधी शासनाने उपलब्ध करून द्यावा, नोकरीत स्वतंत्र आरक्षण ठेवावे तसेच मूलभूत सुविधा पुरवाव्यात, यासाठी शहापूर तालुक्याला दत्तक घ्यावे, अशी मागणी काँग्रेसच्या अपर्णा खाडे, प्रकाश भांगरथ, पत्रकार संजय सुरळके, रमेश वनारसे यांनी केली आहे.