माणसाचे मन किती मृदू व प्रेमळ असते, याबाबतीत नारायण राणेंशी कोणीही तोड करू शकत नाही. त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे, प्रशासनावरील त्यांचा वचक जवळून पाहायला मिळाला.
सिंधुदुर्गनगरी- माणसाचे मन किती मृदू व प्रेमळ असते, याबाबतीत नारायण राणेंशी कोणीही तोड करू शकत नाही. त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे, प्रशासनावरील त्यांचा वचक जवळून पाहायला मिळाला. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रात आमदारांवर एवढा वचक असलेला नेता मी बघितलेला नाही. शिवसेनेत असताना त्यांना मुख्यमंत्रीपदाचा अत्यंत कमी कार्यकाळ मिळाला.
शिवसेनेने तत्पूर्वी अगोदर दोन वर्षे त्यांना मुख्यमंत्री केले असते तर महाराष्ट्राचा इतिहास बदलला असता. त्यांच्या शब्दाला धार आहे, वजन आहे. नारायण राणेंचे नेतृत्व हा काँग्रेसचा मोठा ठेवा आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाने त्यांचा योग्य उपयोग करून घेतला तर त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात बदल होऊन काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास माजी अर्थमंत्री राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या ६४व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ‘सिंधुरत्न फाऊंडेशन’ संस्थेने नारायण राणे ‘माहीत असलेले..माहीत नसलेले’ या विषयावर सुमारे चार तास चाललेल्या कार्यक्रमात शनिवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत नारायण राणे यांच्या गुणवैशिष्टयांचे, त्यांच्यातील अभ्यासू चिंतनशीलपणा, परखड, सजग नेतृत्व, त्यांच्यातील माणुसकी आणि निखळ-निकोप मैत्री, धारदार विनम्रता, वक्तशीरपणा, त्यांच्या मनाचा मोठेपणा, त्यांच्यातील आक्रमक व स्पष्टवक्तेपणा, त्यांच्या नजरेचा धाक, अंत:करणातील हळवेपणा व भावुकपणा, त्यांच्यातील आध्यात्मिक श्रद्धाळूपणा, त्यांच्या स्वभावातील मिश्कीलपणा आदी विविध पैलू उपस्थित मान्यवरांनी उलगडून दाखवले. सिंधुदुर्गनगरीतील शरद कृषी भवनात नारायण राणे यांच्यावर प्रेम करणारे तमाम कार्यकर्ते, हितचिंतक व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
जयंत पाटील पुढे म्हणाले, नारायण राणे हे धाडसी व अतिशय आक्रमक पाऊल टाकतात. व्यक्तिगत दुश्मनी न बघता पक्षाची भूमिका रोखठोक मांडतात. महाराष्ट्राचा अर्थमंत्री या नात्याने मी अर्थसंकल्प मांडला; त्या वेळी त्यांनी त्यावर वेळोवेळी अभ्यासपूर्ण असा हल्ला चढवला.
विधिमंडळात आम्ही त्या वेळी एकमेकांवर टीका करत असू; मात्र आमचे व्यक्तिगत मित्रत्वाचे संबंध राहिले आहेत. ते सडेतोड व कडक बोलतात. काँग्रेस आघाडी सरकारात राज्यकर्त्यां प्रमुखांनी जे निर्णय घेतले पाहिजेत; ते नारायण राणे यांच्या तोंडून यायचे. त्यांच्या मनात आले की ते पटकन निर्णय घेतात.
सेनेतून छगन भुजबळ बाहेर पडले; त्या वेळी त्यांच्यावर संरक्षण घेण्याची पाळी आली; मात्र नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले; तेव्हा सेनेवाल्यांना संरक्षण घ्यायची वेळ आली. राणे काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसची देशव्यापी प्रतिमा आहे.
राजकीय पक्ष मोठा होतो; त्या वेळी त्या पक्षाच्या नेत्याशी कार्यकर्त्यांचा संपर्क तुटतो. सत्तेत दलाल निर्माण होतात. भाजपाचे सध्या तेच चालले आहे.
» नारायण राणेंचं नेतृत्व काँग्रेसचा मोठा ठेवा
» राणेंच्या नेतृत्वाचा काँग्रेसने योग्य उपयोग करून घेतल्यास बदल निश्चित
» मान्यवरांनी उलगडले राणेंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू