कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मृत्यूला आज एक वर्ष पूर्ण होत आहे, तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज अडीच वष्रे पूर्ण झाली. मात्र, त्यांचे मारेकरी व त्यामागील मास्टरमाइंड अद्याप सापडलेले नाहीत. फक्त संशयित आणि शक्यतांभोवतीच तपास घुटमळत आहे. दाभोळकर, पानसरे यांच्या हत्या विचारसारणीच्या व उजव्या, कडव्या संघटनेने केल्याचा आरोपही होत आहे. पण तपास यंत्रणांना या दोन्ही घटनांच्या मुळाशी जाण्यात यश येताना दिसत नाही.
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात स्वत:ला वाहून घेतलेले डॉ. दाभोलकर हे पुरोगामी महाराष्ट्राचा आवाज होते. जादूटोणा विरोधी विधेयकासाठी झगडणा-या नरेंद्र दाभोलकरांनी अनेक भोंदू बुवा-बाबांचे पितळ उघडे पाडले होते. या वैचारिक लढाईतूनच त्यांची हत्या झाली, की त्यामागे दुसरे काही कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. डॉ. दाभोलकरांचे मारेकरी पकडले गेले नाहीत, ही शोकांतिका आहे. गुन्हे शाखेला मारेकरी पकडण्यात अपयश आले. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. त्यालाही भरपूर कालावधी लोटला. तपासात तसूभरही प्रगती झालेली नाही.
गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासातही कोणतीही प्रगती झालेली नाही. या घटनेतील मास्टरमाईंड व मारेकरी शोधण्यात पोलीस प्रशासन व सरकारला अपयश आले आहे. याप्रकरणी संशयावरून कोल्हापूर पोलिसांनी अटक केलेला सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्याविरोधात कोल्हापूर पोलीस आणि ‘एसआयटी’च्या वतीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. समीरला अटक केल्यानंतर ८८ व्या दिवशी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले. तब्बल ३९२ पानी असलेल्या या आरोपपत्रात समीरच्या मोबाईल संभाषणाची सीडी, धार्मिक पुस्तक आदींसह ७७ साक्षीदार आणि नातेवाईकांच्या जबाबांचाही समावेश आहे. मात्र, प्रमुख मारेकरी व मास्टरमाईंड सापडत नसल्याने पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांत मोठी नाराजी आहे.
आजच्या दिवशी अडीच वर्षापूर्वी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील पुलावरून डॉ. दाभोलकर मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. हा पुरोगामी महाराष्ट्रावर आघात होता. संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला गेला. तो आजही व्यक्त होतो आहे. पोलीस प्रशासनाने मात्र या घटनेला गांभीर्याने घेतले नाही. तपासात गुन्हे शाखेची तसूभरही प्रगती झाली नसल्यामुळे सामाजिक कार्यकत्रे केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली.
या याचिकेवर निर्णय देत उच्च न्यायालयाने हा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे डॉ. दाभोलकरांच्या मारेक-यांपर्यंत पोहोचता येईल, अशी आशा निर्माण झाली. सीबीआयने तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस गुन्ह्याची व्याप्ती, स्वरुप आणि कागदपत्रांची माहिती घेण्यात गेले. पुणे पोलिसांनी केलेल्या तपासावरूनच सीबीआयने रेघोट्या मारल्या. दरम्यान, िहदुत्ववादी कार्यकर्त्यांसोबत काही जोतिषी, भोंदुबाबा आणि राशी खडेवाल्यांची चौकशीही होत होती. त्याच वेळी नेमकी जोतिषांची या तपासात मदत घेतली जात असल्याची चर्चाही पोलीस आयुक्तालयामध्ये रंगत होती. पत्रकार आशिष खेतान यांनी केलेल्या स्टींग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी दाभोलकरांच्या तपासासाठी ‘प्लँचेट’ केल्याचे उघड झाले. या प्रकरणाच्या तपासाचे आदेश गृहमंत्रालयानेही दिले होते. मात्र, पुढे काय झाले ? सीबीआयकडे तपास देऊनही पालथ्या घड्यावर पाणी आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांडातील साम्य असलेल्या पुराव्यांचा आता ‘सीबीआय’मार्फत संयुक्तपणे तपास केला जाणार आहे. दोन्ही घटनेचे मिळालेले पुरावे समान आहेत. तेव्हा हत्येतील गोळीच्या रिकाम्या पुंगळ्यांसह गोळीची तपासणी करण्यासाठी ती आपल्याकडे देण्याची मागणी सीबीआयने केली आहे. त्याला जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने परवानगीही दिली आहे.
येत्या २९ फेब्रुवारीला ‘सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅब’चा अहवाल उच्च न्यायालयात मांडला जाणार आहे. मात्र, नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि कर्नाटकचे विचारवंत कलबुर्गी यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली हत्यारे ही एकाच प्रकारची आहेत. पण ते एकच हत्यार नाही, असा बॅलेस्टिक अहवाल कर्नाटक प्रयोगशाळेने दिला आहे. तर दुसरीकडे मुंबईतील कलिना प्रयोगशाळेने दाभोळकर-पानसरे प्रकरणात दिलेला अहवाल पूर्ण वेगळा आहे. या दोन्ही अहवालात तफावत आहे. त्यामुळे आता कर्तव्यात चोख असलेल्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांच्या प्रयोग शाळेकडून अहवाल तपासून घेण्याची मागणी उच्च न्यायालयात केली. ती न्यायालय मान्य करण्याची शक्यता आहे. मुळात डॉ. दाभोळकर आणि कॉ. पानसरे यांच्या प्रकरणातील आरोपी सध्या अटकेत आहेत. तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पण त्यात यश येताना दिसत नाही. त्यामुळे घोडे अडते कुठे, हे समजायला मार्ग नाही.
पुरोगामी महाराष्ट्रात माणसांचा जीव किती स्वस्त झाला आहे, विचारधारेची हत्या धारधार शस्त्रांनी घडवली जात असतानाही सरकार व तपास यंत्रणांना याप्रकरणी गांभीर्यच नसलेले दिसते. पानसरे-दाभोलकरांसारख्या जनाधार असलेल्या विचारवंतांच्या मारेक-यांची कधी गाडी सापडते, कधी बंदूक सापडते, कधी स्केच जारी केले जाते. प्रत्यक्ष आरोपींबद्दल विचारले, तर तपास योग्य दिशेने सुरु असल्याचे सोयिस्कर सांगितले जाते. पाच वर्षापूर्वी ‘आरटीआय’ कार्यकत्रे सतीश शेट्टी यांची हत्या झाली. त्यांच्या तपासाचे काय झाले, हे सर्वाना माहीतच आहे. अडीच वर्षापूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर, तर एक वर्षापूर्वी कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा खून झाला. त्यांच्या कुटुंबीयांसोबत त्यांच्या समर्थकांनी मोठ्या ताकदीने आणि हिम्मतीने लढा देण्याचा निर्धार केला.
शासन व पोलीस प्रशासनाला कर्तव्य बजावण्यासाठी वेळोवेळी मजबूर केले. पण, काही उपयोग झालेला दिसत नाही. बंदुकीच्या गोळ्यांनी विचार मरत नाहीत, हे जरी खरे असले, तरी डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरेंसारख्या कार्यकर्त्यांचा असा करून अंत होणे, हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी लांच्छनास्पद आहे.