गुरुवार (१३ जुलै). वेळ : पहाटे ३.१० मिनिटे. इतक्या मध्यरात्रीही अनेकांचे मोबाइलवर ‘एसएमएस’नी किणकिणले. कारण होते, भारताच्या तिरंगी स्पर्धेतील जेतेपदाचे.
मुंबई – गुरुवार (१३ जुलै). वेळ : पहाटे ३.१० मिनिटे. इतक्या मध्यरात्रीही अनेकांचे मोबाइलवर ‘एसएमएस’नी किणकिणले. कारण होते, भारताच्या तिरंगी स्पर्धेतील जेतेपदाचे. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला ‘फायनल’ सातासमुद्रापार वेस्ट इंडिजमध्ये खेळला जात होता. मात्र निम्म्याहून अधिक भारत रात्री उशिरापर्यंत जागा होता. भारत जिंकल्याने जागरण कामी आले. कर्णधार महेंद्रसिंग ढोणी आणि त्याच्या सहका-यांसह भारतातही जल्लोष साजरा झाला. मात्र अंतिम सामन्यातील शेवटचा दीड-पावणेदोन तासांच्या खेळातील घडामोडी कायम लक्षात राहतील.
चँपियन्स ट्रॉफी जेतेपदानंतर वेस्ट इंडिजमधील तिरंगी मालिकेतही भारत ‘फेवरिट’ होता. श्रीलंकेचे २०१ धावांचे आव्हान फार मोठे नव्हते. शिवाय ३२व्या षटकात ३ बाद १३९ अशा चांगल्या स्थितीत होता. मात्र पुढील १३ धावांत ४ विकेट पडल्याने भारत अडचणीत सापडला. मधली फळी कोसळल्याने ‘फायनल’ गेल्यात जमा होता. जिंकण्यासाठी उर्वरित १२ षटकांत म्हणजे ७२ चेंडूंत केवळ ५० धावांची आवश्यकता होती. धावा आणि चेंडूंमध्ये बराच फरक असला तरी हातात तीन विकेट होत्या. शिवाय कर्णधार ढोणी हाच एकमेव नावाजलेला आणि धावा करू शकणारा फलंदाज मैदानावर होता.
ढोणीने एक बाजू लावून धरल्यामुळे भारतीयांनी टीव्ही संच बंद न करता जागरण सुरूच ठेवले. भुवनेश्वर कुमार आणि आर. विनय कुमारने मैदानावर थांबण्याची तसदी घेतली तरी चेंडू बॅटवर येत नव्हता. त्यातच ठराविक अंतराने दोघांच्याही विकेट घेण्यात श्रीलंकेला यश आले तरी ढोणी नाबाद होताच. ४७व्या षटकात ९ बाद १८२ अशा बिकट अवस्थेतील भारत जिंकला.
शमिंडा एरंगाच्या शेवटच्या षटकातील दुस-या चेंडूवर षटकार, तिस-या चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवर पुन्हा षटकार ठोकत ढोणीने ‘वनडेचे आम्हीच राजे’ असल्याचे दाखवून दिले. मात्र मध्यंतरीच्या काळात धाव घेताना क्षेत्ररक्षकाच्या फेकी आड आला म्हणून श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंनी ढोणी विरोधात केलेले अपील, एका प्रेक्षकाने मलिंगाच्या दिशेने फेकून मारलेली पाण्याची बाटली तसेच ११व्या क्रमांकावरील इशांत शर्माने दोनदा घातलेले लोटांगण सामन्याची रंगत आणि भारतीयांचे टेन्शन वाढवण्यास महत्त्वपूर्ण ठरले.
प्रत्यक्ष स्टेडियमवरील प्रेक्षकांची जी अवस्था होती, तीच टीव्ही पाहणा-यांची होती. ड्रेसिंगरूममधील क्रिकेटपटूही टेन्शनमध्ये दिसत होते. लागोपाठ विकेट पडल्यानंतरची कोहलीची भावमुद्रा पाहण्यासारखी होती. मात्र करोडो लोकांच्या अपेक्षा टिकून असलेला ढोणी मात्र शांत होता. फार तर त्याने दोनदा बॅट बदलली. शेवटी वजनदार बॅटसह खेळणे पसंत केले.
शेवटच्या षटकापर्यंत सामना खेचण्याचे कारण काय, असे विचारल्यानंतर, ‘‘मलिंगा, मॅथ्यूजच्या तुलनेत एरंगा तितका अनुभवी नाही. त्याच्या गोलंदाजीवर धावा होऊ शकतात, हे ठाऊक होते,’’असे ढोणी म्हणाला. भारताला ढोणीसारख्या कर्णधाराची गरज आहे, हे पुन्हा एकदा जाणवले. ‘लीड फ्रॉम फ्रंट’ या म्हणीप्रमाणे ढोणीने नेतृत्वात आणि प्रसंगी फलंदाजीत पुढाकार घेतला आहे. ‘फायनल’मध्ये कोहलीऐवजी ढोणीला कर्णधार बनवल्याबद्दल काही जण निराश झाले. मात्र ढोणी दिलदार आहे, हेही दिसले. जेतेपदाची ट्रॉफी घेण्यासाठी त्याने कोहलीला सोबत नेले. त्याला पुढे करत ट्रॉफी स्वीकारली. ढोणी महान क्रिकेटपटू आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.